भारत, दक्षिण आफ्रिका उर्वरित सामने रद्द !

0

मुंबई: देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा फटका क्रिकेट सामन्याला बसला असून, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरीत दोन सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि तिसरा सामना रिकाम्या मैदानात म्हणजेच प्रेक्षकांशिवाय खेळवला जाईल, असा निर्णय यापूर्वी बीसीसीआयने घेतला होता. दोन्ही संघादरम्यान १५ मार्च रोजी दुसरी वनडे लखनऊ येथे तर १८ मार्च रोजी कोलकाता येथे तिसरी वनडे खेळवण्यात येणार होती. पण आता पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांना आगामी दोन सामन्यांबद्दल उत्सुकता होती.