गेल्या सत्तर वर्षांत भारत व पाकिस्तान यांच्यात दुश्मनी आहे. ही दुश्मनी पाकिस्ताननेच पोसलेली व जोपासलेली आहे. त्यामागे एक मानसिकता कायम राहिलेली आहे. विविध कालखंडांमध्ये भारतात इस्लामी सुलतानांची राजवट होती आणि औद्योगिक क्रांतीनंतर जगाचा चेहरामोहरा बदलून गेल्यावर, इथे ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन केली. साहजिकच ब्रिटिश भारत सोडून निघाले, तेव्हा इथल्या बहुतांश मुस्लीम नेतृत्वाच्या लेखी त्यांनी सत्ता मुस्लिमांच्या हाती सोपवावी, असेच होते. ते स्वीकारले जाण्यासाठी लोकशाही योग्य माध्यम नव्हते. म्हणूनच अनेक अडथळे निर्माण करण्यात आले आणि शेवटी देशाची विभागणी करण्यात आली. त्यातला मोठा प्रदेश हिंदुस्तान वा भारत म्हणून हिंदूबहुल देश झाला आणि जिथे मुस्लीमबहुल लोकसंख्या होती, त्याला पाकिस्तान ठरवले गेले. तिथे जे काही मूठभर हिंदू वा अन्यधर्मीय होते, त्यांना हिंसात्मक वा सतावण्याच्या योजना आखून पिटाळून लावण्यात आले. साहजिकच उर्वरित हिंदुस्तानला इस्लामच्या जोखडाखाली आणणे, हे मुस्लीम नेते व त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे ध्येय बनून गेले. त्याचे नेतृत्व करायला आता पाकिस्तान नावाचा देश वा प्रस्थापित सरकार उभे राहिलेले होते. म्हणूनच त्या देशाची मानसिकता भारताचा द्वेष एवढ्याच राजकीय भूमिकेतून विकसित होत गेली. त्यासाठीच्या धाडसी लष्करी चढायांना भारताने चोख उत्तर दिले. पण, राजकारणात भारताच्या उदारमतवादी पांगळेपणाने पाकिस्तानला नेहमीच प्रोत्साहन मिळत गेले. 1971 सालात इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडून, त्या देशाला अधिक पांगळा करून टाकल्यावर, त्या देशाने वा तिथल्या नेतृत्वाने आपली रणनीती बदलली. आज त्याचेच दुष्परिणाम आपण भोगत आहोत. त्या पराभवानंतर पाकने लढाईचा मार्ग सोडून घातपाताचा मार्ग स्वीकारला. त्यातून आजची गुंतागुंत उभी राहिली आहे.
दरम्यान, भारतामध्येही काही राजकीय बदल सुरू झाले होते. राजकीय मतप्रवाह बदलत होते आणि उदारमतवादाचे प्राबल्य माजलेले होते. त्यात हिंदुत्ववादाला रोखण्याचे जे प्रयास उदारमतवाद किंवा पुरोगामी विचारांनी आरंभले होते, त्याचा आडोसा घेत पाकिस्तानने आपली लढाई या पुरोगाम्यांच्या गळी उतरवण्याची खेळी यशस्वी केली. भाजपा, संघ वा कुठल्याही हिंदुत्ववादाला विरोध करण्याच्या नादात; पुरोगामी चळवळी, संस्था व राजकारण इतके बहकत गेले, की त्यांनी थेट इस्लामी कट्टरवाद वा जिहादी मानसिकतेच्या समर्थनापर्यंत मजल मारली. त्यासाठी मानवाधिकाराची ढाल जिहादींच्या पाठीशी उभी केली आणि अशा पुरोगाम्यांमधील काही बदमाश मतलबी लोकांसाठी पाकिस्तानने आपले खजिने खुले केले. कुठल्याही युद्धात अब्जावधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा भारतामध्ये आपले हस्तक मोक्याच्या जागी बसवून, भारतीय धोरण व नीतीलाच पोखरून टाकण्याचा डाव पाकिस्तान खेळू लागला. कुठलेही राष्ट्र वा समाज अभिमानाच्या पायावर उभा रहातो. त्यालाच पोखरून काढले, मग त्या देशाचा पाया खिळखिळा होऊन जातो. पाकने तेच डावपेच मोठ्या खुबीने खेळले आणि भारतात राष्ट्रप्रेमी वा राष्ट्रवादी या शब्दाचीच खिल्ली उडवली जाऊ लागली. त्याची व्याख्याच शंकास्पद करून टाकण्यात आली. सरकारी खर्चाने उच्चशिक्षण घेणारी मुलेच मातृभूमीचे तुकडे करण्याच्या घोषणा तावातावाने देऊ लागली आणि त्यांच्या बचावासाठी (देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या) काँग्रेस पक्षाचेच नेते वकील उभे राहू लागले. यातून पाकिस्तानने भारताचा पाया किती पोखरून काढला असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. हिंदू, राष्ट्र वा स्वाभिमान हे शब्दच लज्जास्पद बनवले गेले आणि आज आपण त्याचे एकत्रित दुष्परिणाम अनुभवत आहोत. पाक व मुस्लीम यांची चुकीची सांगड घालण्यातून पाकिस्तानचे हस्तक असलेला बुद्धिवादी वर्ग, आज उजळमाथ्याने आपल्यात वावरतो आहे.
आज काश्मीर पेटला आहे आणि हिंसेचा वणवा तिथे पेटलेला आहे. लष्कर व निमलष्कराच्या तुकड्या तैनात करूनही तिथली हिंसा रोखण्यात अपयश येते आहे. त्याची सुरुवात कुठून झाली? अकस्मात काश्मिरात इतक्या मोठ्या संख्येने जिहादी घुसलेले नाहीत वा तरुण मुले सैनिकांवरही दगड मारण्याची हिंमत अचानक करू शकलेली नाहीत. कुठल्याही भागात दंगल माजली, की सामान्य वाटणारी माणसेही लुटारू म्हणून हाती लागेल ते पळवून न्यायला पुढे येतात. बंदोबस्त वा पहारा ढिला पडला, मग असेच होत असते. ही गोष्ट पद्धतशीरपणे घडवून आणली गेली आहे. आज काँग्रेसचे नेते, मोदी सरकार आल्यापासून काश्मीरची स्थिती बिघडल्याचे दावे करीत असतात. पण, त्याची पूर्वतयारी यूपीए काँग्रेस सरकारच्या काळातच केली गेली होती. आज जे काही बिनसले आहे, त्याची पेरणी यूपीएच्या कारकिर्दीत करण्यात आलेली होती. कारण भारत सरकारच्या धोरण व निर्णयात मोक्याच्या जागी तेव्हा पाकिस्तानचे हस्तक येऊन स्थानापन्न झालेले होते. कालपरवा आंतरराष्ट्रीय कोर्टात यूपीएने हरीश साळवे यांना हटवून पाकिस्तानी वंशाचा वकील आणल्याची बातमी प्रसारीत झाली आहे. त्याचे काय कारण होते? वाजपेयी सरकारने एन्रॉन खटल्यात हरीश साळवे यांनाच आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडण्यासाठी नेमले होते आणि 2004 सालात सत्तांतर झाले. यूपीए म्हणून सोनियांच्या हाती सत्ता आली आणि त्याच सरकारने साळवे यांना हटवून पाकिस्तानी वकिलाकडे भारताचे वकीलपत्र सोपवले. याविषयी साळवे यांनी विचारणा केली असता, देशात सत्ता बदलली आहे असे उत्तर त्यांना मिळाले होते. सत्ता बदलली म्हणजे कोणाची सत्ता आली होती? भाजपा वा वाजपेयी जाऊन काँग्रेसची सत्ता आली, की पाकच्या हस्तकांची सत्ता देशात आली होती? केवळ हा पाकिस्तानी वकील नेमणे इतकाच त्याचा पुरावा नाही. अशाच पुराव्यांचा व पुढल्या घटनाक्रमाचा ऊहापोह या मालिकेत करायचा आहे.
2004 सालात सत्तांतर होताच आणि यूपीएचे सरकार आल्यापासून, प्रत्येक सरकारी निर्णय हा भारताला अपायकारक व पाकिस्तानला हितकारक घेतला जावा, हा निव्वळ योगायोग नव्हता. त्याची सुरुवात पाकिस्तानी वंशाचा वकील आंतरराष्ट्रीय कोर्टात नेमून झाली होती. पण, त्याखेरीज अनेक अशा गोष्टी घडत गेल्या, की काश्मिरवरची भारताची पकड ढिली व्हावी आणि तिथे पाकवादी प्रवृत्तीने शिरजोर व्हावे. यासाठी बुद्धिमंतांपासून माध्यमांपर्यंत अनेकांना कामाला जुंपण्यात आले होते. इशरत जहान या पाक हस्तक मुलीचा चकमकीत मृत्यू झाल्यावर तिच्या न्यायाचे नाटक रंगवून भारतीय पोलीस व गुप्तचर खात्यालाही आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यापर्यंत मजल गेली होती. आता त्यातल्या भानगडी चव्हाट्यावर आलेल्या आहेत. तत्कालीन गृहमंत्री चिदम्बरम यांनी इशरतला निर्दोष ठरवण्यासाठी कागदात कशी खाडाखोड केली वा अनेक प्रामाणिक अधिकार्यांचा कसा बळी घेतला? त्याचेही तपशील आलेले आहेत. याकूब मेमन वा अफजल गुरू अशा देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी बुद्धिमंत व मान्यवर कसे पुढे सरसावले, ते आपण बघितलेले आहे. पाक हेरखात्याच्या आशीर्वादाने योजलेल्या समारंभांना भारतातले संपादक, लेखक कसे मेजवान्या झोडायला तिथे जात होते? त्याचे तपशीलही बघणे अगत्याचे आहे. पण नेमक्या त्याचवेळी भारताची सुरक्षा किंवा काश्मिरातील लष्करी कारवाईतून प्रस्थापित होणार्या शांततेला सुरुंग लावण्याच्या अशाच हस्तकांकडून झालेल्या उचापती मात्र फारश्या उजेडात आलेल्या नाहीत. म्हणूनच त्यांची संगतवार मांडणी अगत्याची आहे. भारतीय सैनिकांवर दगड मारण्याची हिंमत कुठून आली? काश्मीर आज इतका हाताबाहेर कशाला गेला आहे? भारतात आज पाकिस्तानचे प्रेम मुठभर बुद्धिमंतामध्ये कशाला उफाळून आलेले आहे? त्याची झाडाझडती म्हणूनच अगत्याची आहे. पुढल्या काही भागात एक एक प्रसंग व घटना घेऊन आपण त्याचीच छाननी करू या.