नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील शत्रूत्व संपले पाहिजे. कर्तारपूर कॉरिडोरमुळे ७१ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. भारत आणि पाकिस्तान सरकारने चांगला निर्णय घेतला असून कर्तारपूर कॉरिडोर हा ईश्वराने बनवलेला रस्ता आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे.
कर्तारपूर साहिब मार्गिकेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानाला गेलेले नवज्योत सिंग सिद्धू आज मायदेशी परतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारत-पाकिस्तानमधील शत्रूत्व संपले पाहिजे अशी भावना व्यक्त केली. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्हयातील डेरा बाबा नानक व पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सिद्धू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सिद्धंनी पाकिस्तानातून निवडणूक लढवल्यास ते नक्कीच जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला. सिद्धू तुम्ही इथून निवडणूक लढवावी. लोक तुमच्यावर भरपूर प्रेम करतात तुम्ही नक्कीच निवडणूक जिंकाल असे इम्रान खान यांनी म्हंटले आहे.
दरम्यान सिद्धूंचा हा पाकिस्तान दौरा वादात सापडला आहे. पायाभरणी समारंभाच्या कार्यक्रमात खलिस्तानी नेता गोपाल चावला देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत चावलाने छायाचित्रही काढले असून हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.