भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीत विराट कोहलीचा विक्रम

0

पर्थ: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात 2 बाद 8 अशा दयनीय अवस्थेत असणाऱ्या भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीने सावरत तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी कोहली व पुजारा या जोडीने केली. मिचेल स्टार्कने पुजाराला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली, परंतु, कोहलीने धावांचा वेग कायम राखत चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसह धावगती कायम राखली. कोहलीने या दरम्यान 20 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम नावावर केला.

विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी पुजारासह 74 धावा केल्या. या भागीदारीने अडचणीत सापडलेला संघ सुस्थितीत आला. 103 चेंडूंत 24 धावा करणारा पुजारा बाद झाल्यानंतर कोहलीने सामन्याची सुत्रे हातात घेतली. त्याने रहाणेला मनमोकळी फटकेबाजी करण्याची संधी दिली आणि दुसऱ्या बाजूने तो खेळपट्टीवर तग धरून उभा राहिला. कोहलीने 109 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत विक्रम नावावर केला.

कोहलीने या वर्षात 19 पेक्षा अधिक वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने चौथ्यांदा हा पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. आजच्या अर्धशतकी खेळीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. पाँटिंग व संगकारा यांनीही 4 वेळा कॅलेंडर वर्षांत 19 पेक्षा अधिक वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत.