मुंबई । यंदाच्या 2017 वर्षापाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाचे 2018 या आगामी वर्षातले वेळापत्रकही व्यस्त असणार असे संकेत मिळत आहेत. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार आहे. वर्षभर घरच्या मैदानावर खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा भारतासाठी एखाद्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिला परदेश दौरा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यानंतर 8 ते 20 मार्चदरम्यान भारतीय संघ श्रीलंकेत तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळणार आहे. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन संघांमध्ये ही मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत प्रत्येक संघ दोन सामने खेळणार असून, अंतिम सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंकेच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या तिरंगी मालिकेचे आयोजन केलेले आहे. 1998 साली श्रीलंकेच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त निधास चषकाचे आयोजन करण्यात आले होेते. तिरंगी मालिकेत सहभागी होण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयने श्रीलंका आणि भारत यांच्यात घरच्या मैदानावर छोटीशी मालिका खेळण्याची अट घातली होती. यानुसार भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाल्यानंतर बीसीसीआयने तिरंगी मालिकेत आपण सहभागी होत असल्याचे कळवले आहे.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून मिळालेल्या आमंत्रणाबाबत बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी म्हणाले की,श्रीलंकेच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने आयोजित मालिकेत भारतीय संघाला सहभागी होता आलं. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. श्रीलंका हा आमचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या तिरंगी मालिकेचं आमंत्रण आम्ही स्विकारले आहे. दक्षिण आफ्रिका दौर्यात भारतीय संघ चार कसोटी सामने, सहा एकदिवसीय क्रिकेट आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.