कळवण: मुलाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथूनसप्तश्रृंगी गडाला गेलेल्या भाविकांच्या कारला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे ही घटना घडली. या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. भाविकांची आयशर गाडी नादुरुस्त होती, त्यामुळे रस्त्याच्याकडेला ही कार पार्क करण्यात आली होती. मात्र पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या कारला जोरदार धडक दिली. यात चार जण ठार झाले. गणेश प्रसाद ठाकूर, कुणाल कैलास ठाकूर, सागर अशोक ठाकूर आणि आशिष माणिक ठाकूर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
रात्री १२ वाजेच्या सुमारास दहा किलोमीटर अंतरावर वणी-नाशिक मार्गावरील कृष्णगाव येथे ही कार बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या कारची व्यवस्था करण्यासाठी आठ ते दहा भाविक कारच्या खाली उतरले. दुसऱ्या कारची वाट पाहत असतानाच वणीहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या कारला पाठिमागून जोरदार धडक दिली. मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेमुळे ही कार २० ते २५ फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. कारमध्ये बसलेले ललीताबाई अशोक ठाकूर, अनिल रमेश ठाकूर, ध्रुप बिंद्राबन ठाकूर, रंजिता ध्रुप ठाकूर, माणिक चिंतुलाल ठाकूर आणि पल्लवी ठाकूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून इतर दहा ते बाराजणांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर जखमी भाविकांनी प्रचंड आक्रोश केल्याने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.