भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी- संभाजी महाराज देहूकर

0
‘भिडे यांची भीड ठेवण्याइतके आम्ही वारकरी नामर्द नाही’ 
पिंपरी-चिंचवड : संभाजी भिडे यांनी तलवारी हातात घेऊन धारकरी होण्यापेक्षा टाळ हातात घेऊन वारकरी व्हावे, म्हणजे त्यांना तुकोबाराय कळतील. कोण पुढे कोण मागे असला दांभिक मनुवादी विचार वारकरी संप्रदायाला मान्य नाही, अशी अशी टीका संत तुकाराम महाराज यांचे वंशज संभाजीमहाराज देहूकर यांनी केली आहे. तसेच भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी आहेत, असेही त्यांनी म्हटले.
शुद्ध विचार जगणारे आम्ही वारकरी
पुण्यात संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनु मोठे आहेत, असे वक्तव्य केले होते. त्यावर देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी विश्‍वस्त संभाजी महाराज देहूकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून भिडे यांच्यावर टीका केली आहे. पत्रकात म्हटले आहे की, तुकोबारायांचा रोखठोक भक्तीवाद देखील आम्हाला माहिती आहे. भिडे हे संतद्रोही आणि पाखंडी आहेत. याच जाणिवेतून अशा लोकांचे खंडण आणि मंडण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंग लिहून ठेवला आहे. ‘धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे’ असे तुकोबारांयाचे शुद्ध विचार जगणारे आणि जागविणारे आम्ही वारकरी आहोत.
मंबाजी होवून वारकर्‍यांचा छळ
भिडेंसारखा सांप्रत मंबाजी-दंभाजी होऊन वारकरी संप्रदायाच्या अस्मितेचा छळ करत आहे. आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन मांडले आहे. त्यापूर्वी ज्ञानोबा तुकोबारायांच्या अभंगाचे दर्शन घेतले असते. तर, नाठाळ बुद्धी सोज्वळ झाली असती. मनुचे साक्षात्कारी वारसदार म्हणून घेणा-या गुरूजींनी संतांच्या अभंगमय विचारांना वारकरी होऊन स्पर्श केला असता तर अशी नाठाळ आणि बुद्धीभेद करणारी असभ्य वक्तव्ये केली.
वारकर्‍यांची क्षमा मागा
केवळ एका समाजाच्या भल्यासाठी मनुंनी जातीभेद वर्णभेद, लिंगभेद आणि धर्मभेद केला. कर्मकांडाच्या भिंती उभ्या करून वेदाला आणि देवाला कोंडून ठेवले. त्या सगळ्या कणखर भिंती उखडून टाकण्यासाठी ज्ञानोबारायांनी पसायदान, ज्ञानेश्‍वरी लिहिली. ’विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असा आकाशाएवढा व्यापक भक्तीवाद तुकोबांनी जगापुढे ठेवला. यामुळे भिडे गुरुजींनी प्रायश्‍चित्त घेण्यासाठी वारक-यांची क्षमा मागावी, अशी मागणीही संभाजी महाराज देहूकर यांनी केली आहे.