भुसंपादनासंदर्भात शेतकर्‍यांनी प्रतिक्रिया कळवाव्यात

0

पुणे । चाकण टप्पा क्र.5 मधील भुसंपादनासंदर्भात शासनाने एकरी 55 ते 65 लाख रुपयांचा दर ठरवला आहे. या दरनिश्‍चितीच्या सहमतीबाबत शेतकर्‍यांनी आपल्या प्रतिक्रया लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली चाकण टप्पा क्र.5 च्या दरनिश्चितीबाबतची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस भूसंपादन अधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बैठक दोन सत्रात पार पडली. पहिल्या सत्रात आंबेठाण, बिरदवडी, रोहकल येथील शेतकर्‍यांना एमआयडीसीमार्फत शासनाच्या नियमांना अनुसरून 55 लाख प्रति एकर व दुसर्‍या सत्रात गोनवडी, वाकीखुर्द, चाकण येथील शेतकर्‍यांना 65 लाख प्रति एकर दर निश्चित केल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत शेतकर्‍यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. तसेच या दरांशी सहमत असलेल्या व नसलेल्या शेतकर्‍यांनी आपल्या प्रतिक्रया लेखी स्वरुपात कळवाव्यात, लवकरात लवकर त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन काळे यांनी दिले.