भुसावळातील अतिक्रमितांचे उपोषण सुटले ; प्रांताधिकार्‍यांनी दिले पत्र

0

भुसावळ- शहरातील रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने हटवल्यानंतर त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडण्यात आले होते. तीन दिवसानंतरही उपोषणार्थी मागण्यांवर कायम होते. बुधवारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी अतिक्रमितांच्या प्रश्‍नी पालिका प्रशासनाला पत्र देत योग्य ती कारवाई करण्याबाबतचे लेखी पत्र दिल्याने उपोषणार्थींनी सायंकाळी उपोषण सोडले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांनी उपोषणार्थींना प्रांताधिकार्‍यांच्या पत्राची प्रसंगी प्रत दिली. उपोषणार्थींना शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेली सर्वे क्रमांक 63/1 ही जागा मान्य नसून सर्वे क्रमांक 181, 182, 183, 191, 192 या परीसरातील ओपन स्पेस तसेच सरकारी जागा देण्याची मागणी करण्यात आली होती तर माजी उपनगराध्यक्ष मोहन निकम यांच्या नेतृत्वात उपोषण छेडण्यात आले होते. प्रसंगी जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, राजू डोंगरदिवे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अनेकांनी दर्शवला उपोषणाला पाठिंबा
या उपोषणाला बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दर्शवला. निवेदनावर शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, श्याम हसन पिंजार शे, सईद शेख, शेख रईस शे.अलीम, शेख सलमाम शेख मुस्ताक, शेख रफिक शेख गफूर, शकील शाह गुलाब शाह, शेख सुलमान शेख सुलेमान, शेख शेरू शेख सलाम आदींनी पाठिंबा दर्शवला आहे. या शिवाय भारीप बहुजन महासंघातर्फेही पाठिंबा देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, तुषार जाधव, निलेश जाधव, अरुण नरवाडे, रूपेश साळुंखे, अरुण तायडे, विद्यासागर खरात, गणेश इंगळे, देवदत्त मकासरे, संगीता भामरे, प्रल्हाद घारू आदींनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, मनसेतर्फे महिला शहराध्यक्षा रीना साळवी यांनीही पाठिंबा दर्शवला होता.