गटनेता उल्हास पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा सोनवणेंसह संतोष चौधरींचे पद अबाधीत
भुसावळ- पालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ घालून मुख्याधिकार्यांना बाहेर काढण्याची मागणी करीत त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी जनआधारच्या नगरसेवकांवर कारवाईबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करीत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी 20 ऑक्टोबर रोजी जनआधारचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांना नगरसेवक पदावरून अपात्र करत पाच वर्ष नगरपालिका निवडणूक वा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास बंदीही घातली होती. या निर्णयाविरोधात नगरसेवकांनी खंडपीठात रीट पीटीशन दाखल करून दाद मागितली होती. नगरसेवकांवरील कारवाई नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नसल्याने व त्यांना म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्याने न्यायालयाने राज्य शासनाला फटकारल्याने राज्य शासनाने निर्णय मागे घेतल्याने चारही नगरसेवकांना दिलासा मिळाल्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.