सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारींनी नगराध्यक्ष रमण भोळेंना धरले धारेवर ; शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ
भुसावळ : दरवेळी विरोधकांमुळे गाजणारी पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी मात्र सत्ताधारी नगरसेवकांनी गाजवली. निमित्त ठरले शहरातील अमृत योजनेचे. सत्ताधारी नगरसेवक युवराज लोणारी यांनी अमृत योजनेच्या पाईप लाईनमुळे शहरातील रस्ते जर्जर झाल्याने लोक आम्हाला शिव्या घालत असून जैन कंपनीच्या ठेकेदारावर काय कायदेशीर करणार, आम्ही येथे बोलायचे नाही तर काय विरोधकांप्रमाणे निवेदने द्यायची? असा संतप्त सवालही उपस्थित करीत जलकुंभाचे कामही पूर्ण न झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला. सत्ताधार्यांनीच आता पालिका सभागृहात तोंड उघडल्याने ही आगामी नवीन राजकारणाची तर नांदी ना? असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव असून यामुळे सत्ताधार्यांमधील दुफळी उघड झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या रोषात शहर विकासाच्या 35 विषयांना सभागृहाने मंजुरी दिली.
सत्ताधार्यांनी गाजवली सभा
सभेच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात महापुरात मृत झालेल्या नागरीकांसह स्व.सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीचा वाहण्याची सूचना प्रा.सुनील नेवे यांनी मांडल्यानंतर सभागृहाने दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली. विषय क्रमांक 32 चे वाचन होत असताना नगराध्यक्षांनी माईक हाती घेत त्या संदर्भात माहिती देत असताना नगरसेवक लोणारी यांनी मला बोलायचे आहे, असे सांगून माईक घेतला मात्र नगराध्यक्षांनी त्यांना खाली बसण्याची सूचना केल्यानंतर लोणारी यांनी मला आधी बोलू द्या, आम्ही येथे बोलायचे नाही तर कुठे बोलायचे? विरोधकांप्रमाणे आम्ही निवेदने देवून गप्प बसायचे का? असा प्रश्न केल्याने वादाची ठिणगी पडली. जैन कंपनीला अटल योजनेचे काम दिल्यानंतर अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. शहरातील रस्ते खोदण्यात आल्याने चिखल झाल्याने चांगल्या रस्त्यांचे डांबरीकरण उखडले असून नागरीक आम्हाला शिव्या घालत आहेत त्यामुळे दोषी कंपनीवर काय कारवाई करणार? हे सभागृहाला सांगा, असा आग्रह त्यांनी धरला. अमृतच्या जलकुंभाचे काम अपूर्ण आहे, केवळ भूमिपूजन उरकण्यात आले मात्र आमच्या प्रभागाची आम्हाला काळजी आहे, आम्हाला नागरीकांना उत्तरे द्यावी लागतात, असे सांगत त्यांनी संतापही व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पालिकेकडे एक टक्केदेखील मनुष्यबळ नाही, शासनाने एमजीपी या एजन्सीची नेमणूक केल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन कमी दराचे टेंडर जैन कंपनीचे असल्याने काम देण्यात आले त्यामुळे दिशाभूल करण्याचा प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जनआधारच्या नगरसेवकांचा संताप
जनआधारच्या नगरसेविका निलिमा सचिन पाटील यांनी प्रभागातील फुटलेल्या पाईप लाईनबाबत संताप व्यक्त केला व त्याबाबतचा व्हिडिओच मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना दाखवला तर गटनेता उल्हास पगारे यांनी शहरातील रस्त्यांची वाताहत व अनियमित पाणीपुरवठ्याची तक्रार केली तसेच विरोधकांच्या वॉर्डात कामे होत नाहीत, पालिकेचे अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली.
नगरसेवक कोठारींनी मांडला अभिनंदनाचा ठराव
नगरसेवक पिंटू कोठारी यांनी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे फोन उचलत नसल्याने संताप व्यक्त करीत नगरसेवक युवराज लोणारी, मीनाक्षी नितीन धांडे, अमोल इंगळे यांनी पालिकेने आणलेल्या वृक्षांचे चांगले संगोपन करीत शहर सुशोभीकरण केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी शहर विकासाच्या 35 विषयांना मंजुरी देण्यात आली.