भुसावळात केशरी रेशनकार्ड धारकांनी सोशन डिस्टन्सचे करावे पालन

0

भुसावळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या व एक लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना मे व जून महिन्यात सवलतीच्या दराने अन्नधान्य दिले जाणार आहे. त्यानुसार केशरी रेशनकार्ड धारकांना प्रती व्यक्ती आठ रुपये दराने तीन किलो गहू व बारा रूपये दराने दोन किलो तांदूळ मिळणार आहे परंतु सर्वच केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य मिळणार असून गर्दी होण्याची शक्यता आहे म्हणून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संबधित लाभार्थींनी दुकानामध्ये गर्दी न करता प्रत्येक ग्राहकामध्ये एक मीटर अंतर ठेवून तोंडाला मास्क लावून धान्याची उचल करावी तसेच स्वतःच्या व रेशन दुकानदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने नागरीकांनी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.

शेवटच्या पानावर शिक्का मारणार
मे व जून महिन्याच्या धान्य वितरणाचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ज्या केशरी रेशन कार्डधारकांची नोंद ऑनलाईन झाली नसेल, त्यांनाही सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार आहे. धान्य दिल्यानंतर त्यांच्या रेशनकार्डवर धान्य दिल्याची पोहोच म्हणून रेशनकार्डच्या शेवटच्या पानावर शिक्का मारण्यात येणार आहे.

लाभार्थींना पावती देणे अनिवार्य
धान्य वाटप सुरळीत व्हावे, यासाठी सर्व स्वस्त धान्य दुकाने दररोज वेळेचे नियोजन देण्यात आले आहे. नियमित व मोफत तसेच केशरी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करताना लाभार्थीला पावती देणे स्वस्त धान्य दुकानदारांना अनिवार्य करण्यात आले आहे अशा सूचनाही शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.