भुसावळ तालुक्यात चार हजार 500 विद्यार्थी देणार बारावी परीक्षा

0

भुसावळ- तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर चार हजार 500 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. पहिल्या दिवशी गुरूवारी इंग्रजीचा पेपर असून परीक्षेवर स्थानिक तसेच जिल्हा स्तरावरील भरारी पथकांचे नियंत्रण राहणार आहे.

शहरात तीन हजार 408 विद्यार्थी देणार परीक्षा
के. नारखेडे विद्यालयांमध्ये परीरक्षक कार्यालय असून या कार्यालयाचे परीरक्षक म्हणून गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते तर उपपरिक्षक म्हणून एस.पी.कवठे व आर.पी.चौधरी काम पाहणार आहेत. या कार्यालयांतर्गत डी.एल.हिंदी हायस्कूलात 864, के.नारखेडे विद्यालयात 418, डी.एस.हायस्कूल येथे 432, श्री संत गाडगे महाराज हिंदी हायस्कूल येथे 398, बी.झेड. उर्दू हायस्कूल येथे 395 तर नाहाटा महाविद्यालयात 901 असे एकूण 3 हजार 408 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील परिरक्षक कार्यालयांतर्गत महात्मा गांधी विद्यालयात परिरक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान काम पाहतील. या अंतर्गत इंग्रजी विषयासाठी दोन केंद्र करण्यात आले असून महात्मा गांधी विद्यालयात 775 तर उर्वरित विद्यार्थी गंगाधर सांडू चौधरी विद्यालयात परीक्षा देतील.