भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करा – राजभर

0

लखनऊ : देशातून भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करा, पुन्हा एकदा नोटाबंदीचा निर्णय घ्या असा अजब सल्ला योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी दिला आहे. भाजपाविरोधात काहीतरी विधान करून पक्ष अडचणीत आणण्याचं काम यापूर्वीही राजभर यांनी केलं आहे. आता पुन्हा एकदा पक्षाच्या विरोधातली भूमिका घेत ५०० आणि २ हजाराच्या नोटा बंद करण्यात याव्यात असा सल्ला राजभर यांनी दिला आहे.

भ्रष्टाचार संपवायचा असेल तर १ रुपया ते १०० रुपये एवढ्याच नोटा चलनात ठेवाव्यात असाही सल्ला राजभर यांनी दिला. २ वर्षांपूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी ५०० आणि आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्णयानंतर २ हजाराची नोट मोदी सरकारनेच चलनात आणली. आता २ हजाराच्या नोटा आणि ५०० च्या नोटांवर बंदी आणली जावी अशी मागणी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे.