मंत्रिमंडळ विस्तारावर खडसे नाराज; मनातील खदखद बोलून दाखविली !

0

नवी दिल्ली: आज फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. कॉंग्रेसमधून भाजपात गेलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान माजीमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षातून भाजपात प्रवेश करुन मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांबद्दल भाष्य करताना एकनाथ खडसेंनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. आमच्याकडे चार-पाच वेळा निवडून आलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही. स्वाभाविक ते नाराज होतात. मात्र पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. पक्ष हितासाठी, पक्ष वाढीसाठी काही निर्णय घेतले जातात. सत्ता आली की सत्तेचे गुण आणि अवगुण लागत असतात अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. खडसे सध्या दिल्लीत असल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह राहिला नाही असे म्हटले.

मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना संधी मिळेल असे बोलले जात होते. मात्र पुन्हा एकदा खडसेंना डावलण्यात आले आहे. विखे पाटील यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास आहे. काँग्रेस, शिवसेना आता भाजपामध्ये येत त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या पक्षात जाण्याचा अजिबात विचार नाही. सत्तेसाठी पक्ष बदलणे माझ्या स्वभावात नाही. विरोधात असताना अनेक ऑफर आल्या. तुमचा पक्ष सत्तेत कधीच येणार नाही असे सांगितले गेले मात्र आज आम्ही सत्तेत आलो असल्याचे खडसेंनी सांगितले.