मंत्री असल्याने शहाणपण येत नाही, ‘नया है वह’; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

0

मुंबई: विरोधी पक्षनेते सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यावर सत्ताधारी आरोप करत आहे. फडणवीसांचा हा राजकीय दौरा असल्याचे बोलले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका करताना ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केली. त्यावर आज फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘नया है वह’, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. मुंबईत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

“मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवतात. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतेच असे नाही ना? ते नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसाने त्यावर फारकाही प्रतिक्रियाही देऊ नये.” असेही फडणवीस यांनी सांगितले.

करोनाच्या काळात विरोधक राजकारण करत आहेत, राज्यभर फिरून सरकारवर टीका करत आहेत. ते सध्या आपत्ती पर्यटनात (डिझॅस्टर टुरिझम) व्यग्र आहेत, असा टोला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. विरोधी पक्ष काय करतो, यापेक्षा आम्ही लोकांना अधिकाधिक मदत कशी करता येईल आणि प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहील यावर भर देत आहोत, असेही ते म्हणाले होते.