भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष मालगाड्या (फ्रेट) आणि पार्सल गाड्या सुरू करण्यात आल्या असून 5 जूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक आदी स्थानकांपासून नागपूर, सिकंदराबाद, चेन्नई आणि शालिमार येथे जाण्यासाठी विविध ठिकाणी नऊ हजार 755 टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांतून पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
30 जूनपर्यंत चालणार पार्सल गाड्या
लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आल्यामुळे आणि सध्याची गरज लक्षात घेऊन शालिमारसाठी पार्सल गाड्या 30 जूनपर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी तीन हजार 336 टन खाद्यपदार्थ/नाशवंत पदार्थ आणि पाच हजार 80 टन हार्ड पार्सलची वाहतूक करण्यात आली. लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने एक हजार 152 टन औषधे/फार्मा उत्पादनांची वाहतूक केली आहे. या विशेष पार्सल गाड्यांद्वारे झालेल्या वाहतूकीत 97 टन पोस्टल/आरएमएस बॅग आणि 89 टन ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे.लॉकडाऊन कालावधीत केलेल्या पार्सल वाहतुकी मधून मध्य रेल्वेला 3.64 कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.