मनपाची 15 पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम

0

मुख्य रस्त्यांवरील काढणार अतिक्रमण;बांधकामसह नगररचना विभागाचे पथक

जळगाव:- शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पून्हा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम 15 जानेवारीपासून राबविण्यात येणार असून त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागासह बांधकाम विभाग आणि नगररचना विभागाचा पथकात समावेश आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुभाष चौक, टॉवर चौकासह मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. परिणामी पार्कींग आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालयाजवळील,न्यायालयासमोरील अतिक्रमण काढले होते. आता पून्हा अतिक्रमण वाढले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे पून्हा 15 जानेवारीपासून मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

या रस्त्यांवरील काढणार अतिक्रमण

महाबळ ते शनिपेठ पोलीस चौकीपर्यंत,नेहरु चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत,अण्णाभाऊ साठे पुतळा ते स्वातंत्र्य चौक ,एम.जे.कॉलेजर्पंत,शास्त्री टॉवर ते अंजिठा चौफुली, घाणेकर चौक ते बेंडाळे चौक,बेंडाळे चौक ते इच्छादेवी चौक,सेंट टेरेसा स्कूलपर्यंत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त मागविणार

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात येणार असून पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात येणार आहे. तसेच या मोहीमेच्या पथकात अतिक्रमण निर्मूलन विभागासह बांधकाम विभाग आणि नगररचना विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे.