जळगाव । महापालिकेत भाजपा पायउतार झाल्यानंतर नगरसेवकांचा खो-खो सुरू झाला आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपातुन गेलेले नगरसेवक शिवसेनेत होते. नंतर पुन्हा भाजपात आले आणि आता पुन्हा शिवसेनेची मफलर घालत चार नगरसेवकांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सकाळी प्रवेश झाल्यानंतर सायंकाळी दोन नगरसेविकांनी आम्ही भाजपातच असल्याचा पुर्नरूच्चार केला. तसेच विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही पालकमंत्री ना. पाटील यांची भेट घेतली. आम्ही शिवसेनेत कुठलाही प्रवेश केला नसल्याचे सांगत नगरसेविकांनी राजकीय गोंधळ उडवुन दिला आहे.
जळगाव महापालिकेच्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 57 नगरसेवकांच्या जोरावर भाजपने महानगरपालिकेत झेंडा फडकविला होता. मात्र अडीच वर्षातच अंतर्गत गटबाजीचा भाजपला फटका बसल्याने 57 पैकी सुरुवातीला 27 आणि त्यानंतर 3 असे एकूण 30 नगरसेवकांनी बंडखोरी करीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपची बहुमातात असलेली सत्ता शिवसेनेने खेचून आणत महापालिकेवर भगवा फडवला.
काही महिन्यांपुर्वी प्रभागातील विकासकामे आणि विकासाच्या निधीवरुन शिवसेनेवर नाराज झालेले दहा नगरसेवक स्वगृही अर्थात भाजपमध्ये परतले होते. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबलनुसार भाजपची संख्या जास्त असल्याने शिवसेनेची कोंडी होणार होती. मात्र सभागृह नेते ललित कोल्हे, विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी रणनीती आखत भाजपचे चार नगरसेवक आपल्या गळाला लावले. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवक प्रविण कोल्हे, नगरसेविका प्रिया जोहरे, मिनाक्षी पाटील आणि मीना सपकाळे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले.
सकाळी प्रवेश सायंकाळी घुमजाव
सकाळी पालकमंत्री ना. पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत गेलेल्या चार पैकी दोन नगरसेविकांनी सायंकाळी घुमजाव केले. नगरसेविका मिनाक्षी पाटील व मीना सपकाळे यांनी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला नसुन आमच्या गळ्यात मफलर टाकण्यात आली. तसेच आम्ही विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेतली. आम्ही भाजपातच असल्याचे नगरसेविका मिनाक्षी पाटील यांनी दै. ‘जनशक्ती’ शी बोलतांना सांगितले.
संख्याबळाबाबत संभ्रम
2018 सालच्या सार्वत्रिक निवडणुकित भाजपचे 57 नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले होते. जुलै 2021 मध्ये भाजपातील 30 नगरसेवकांनी बंडखोरी केली व शिवसेने सोबत सत्ता स्थापन केली. ऑक्टोबर 2021 मध्ये यातील 10 नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये गेले. शुक्रवारी या गेलेल्या 10 बंडखोरांपैकी 4 नगरसेवक पुन्हा शिवेसनेत आले. सायंकाळी चारपैकी दोन नगरसेवक यांनी भाजपातच असल्याने महापालिकेत संख्याबळाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.