मुंबई । मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील 1388 पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण या परीक्षेत अनेक उमेदवार उत्तीर्ण जरी झाले असले, तरी यामध्ये केवळ 1388 उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. याचसोबत यंदा उत्तीर्ण उमेदवारांची प्रतीक्षा यादी बनवली जाणार नाही. त्यामुळे 1388 उमेदवारांमधून जर कोणता उमेदवार तांत्रिकदृष्टया बाद झाला तर त्यापुढील उमेदवाराचा विचार केला जाईल, अशी माहिती सामान्य विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील 1388 कामगार पदांसाठी महापालिकेने मागवलेल्या ऑनलाईन अर्जांमध्ये एकूण 2 लाख 87 हजार अर्जदार अंतिम ठरले. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षाही पार पडली.
या परीक्षेचा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक इमेल आयडीवर पाठवण्यात आला आहे. उमेदवाराने सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नांच्या उत्तराचे मॉड्युलर तयार करून पाठवले आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांनी उत्तरे तपासून आपले गुण स्वत:च तपासावे आणि त्यात कमी जास्त होत असतील तर आलेल्या इमेल आयडीवर लिहून पाठवावे, अशी सूचना महाऑनलाईन संस्थेने केली आहे. सर्व उमेदवारांना गुणांच्या या हरकती आणि सूचनांसाठी 5 मार्च ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांचे गुण जाहीर करून 1388 उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. परंतु या भरती परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी बनवली जाणार नसल्याचं सामान्य विभागाने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी झालेल्या कामगारांच्या भरतीमध्ये बहुतांशी उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.