मनापासून मोहन भागवतांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले! : उद्धव ठाकरे

0

मुंबई। मनापासून मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवतांच्या नावाचा पुनरुच्चार केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. मनपासून मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवले आहे.

कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको?
हिंदूराष्ट्र संकल्पनेसाठी भागवत हेच लायक असतील का, ह्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, का नसावेत? इतर राज्यपाल निवडणूक पाहा. इतरत्र ठिकाणी आरएसएस कार्यकर्त्यांची नेमणूक करतो, मग देशाचे नेतृत्त्व त्यांनी करायला हरकत नाही. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. शरद पवारांच्या बाबतीत बोलायचे तर ते नरेंद्र मोदींचे गुरु आहेत, असे स्वत: मोदींनी सांगितले. त्यांना पद्मविभूषण दिले. मला माहित नाही कोणाच्या मनात काय येईल. एकमेकांची मने जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

शेतकर्‍यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे
उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी कायम परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकर्‍यांना एकदा तरी पूर्णपणे कर्जमुक्त केले पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी आमच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडले. हा पवित्रा शेतकर्‍यांसाठी घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आत्महत्याग्रस्त जिह्यासाठी मदत द्या, अशी बातमी वाचली. एखादा जिल्हा आत्महत्याग्रस्त होईपर्यंत वाट न पाहता शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे, पण शिवसेना त्यांना वार्‍यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकर्‍यांच्या मागे आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच सरकारने दखल घेतली पाहिजे. शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही, असा कारभार केला पाहिजे आणि मला तशी अपेक्षा आहे.

पेट्रोलचे दर देशभरात समान असावेत
पेट्रोलवर व्हॅट लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. जागतिक बाजारपेठेत पेट्रोल, डिझेल दर खाली आले आहेत. तरीदेखील आपल्या देशात दर चढेच आहेत. जर समान कर लावणार असू तर देशभरातील दर समान असायला हवेत, अशी माझी अपेक्षा आहे. इतर राज्यात आपल्या सोयीने दर लावतात. त्यामुळे दरवाढ होते. जर समान कर लावणार असू तर देशभरात दर पण समान असायला हवेत. मुंबईत सगळ्यात जास्त दराने पेट्रोल विकले जात असेल तर ते चूक आहे, असे ते म्हणाले.

राणे आणि भाजप, दोघांना शुभेच्छा
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत मी बोलणार नाही. त्या दोघानांही शुभेच्छा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी तो विषय टाळला.