मुंबई : मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या राज्यातील परिस्थिती विदारक असून, आंदोलक बसगाड्या जाळत आहेत. पोलिसांवर दगड फेकले जात आहेत, अशी चिंताही न्यायालयाने व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर आदींसह अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. काही ठिकाणी बस जाळण्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेकही झाली. या हिंसक घटनांवर आज उच्च न्यायालयाने नाराजी आणि चिंताही व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक आहे. पोलिसांवर दगडफेक केली जात आहे. तसेच बसगाड्याही जाळल्या जात आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तत्पूर्वी, सीबीआय आणि एसआयटीने दाभोलकर-पानसरे हत्याकांडाच्या तपासाच्या प्रगतीचा सीलबंद अहवाल न्यायालयात सादर केला. तो न्यायालयाने न वाचताच परत केला आणि तपासावर नाराजी व्यक्त केली. तपास अहवालात वारंवार त्याच गोष्टी न्यायालयासमोर मांडल्या जातात. तपास अधिकारी बदलले जातात, अशी नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली.
या घटनांचा समाजावर होणारा परिणाम खूप गंभीर असतो. आम्हाला याची जास्त काळजी वाटते. सरकारे बदलत राहतील. देशाचे काय? अशीच परिस्थिती राहिली तर देशात अनेकांना संरक्षण देण्याची वेळ येईल आणि पुढील काळात उच्च न्यायालयाच्या अस्तित्वावरही प्रश्न उपस्थित केले जातील? उच्च न्यायालयही काही करू शकत नसल्याचा संदेश जाईल. असेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, तपास यंत्रणांकडून आणखी दोन महिन्यांचा अवधी मागण्यात आला आहे.