मुंबई : मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गा अंतर्गत आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवसायिक शाखेत प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होते. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असता, आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, जात पडताळणी प्रमाणपत्राऐवजी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती (टोकन) ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती. याबाबत उत्तर देताना, सभागृहातील सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतच्या विषयावर आग्रहाने मागणी केली होती. मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसह आमच्याकडून बैठक घेण्यात आली आहे. त्यामध्ये, जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, प्रवेशावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले. दरम्यान, मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.