संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे. इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या स्पर्धेत टिकू शकते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्हणून त्याला केजीपासून इंग्रजीचे धडे शिकवण्यास प्रारंभ केल्या जातो. सध्या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे की, प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले की त्याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही. परंतु, वास्तव काही उलट आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मुलामुलींच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मात्र, आपल्याच राज्यात आपण आपल्या मराठी भाषेला पदोपदी ठार करत आहेत. बहुतांश वेळा आपण गांभीर्याने विचार न करता भाषेचा वापर करत असतो, त्यामुळे भाषेची पुरती वाट लागून जाते. ज्यांना भाषेच्या प्रत्येक शब्दांत असलेल्या सौंदर्य आणि सामर्थ्यांची जाणीव नसते, त्यांना वाक्यरचनेशी किंवा शब्दाशी काही देणे-घेणे नसते, अशा लोकांच्या भाषेमुळे मराठी भाषा रसातळाला जात आहे, म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आज प्रत्येकजण आपल्या पाल्यांना मराठीच्या शाळेत शिकवण्याऐवजी इंग्रजी मिशनरीच्या शाळेत शिकवण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे. इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या स्पर्धेत टिकू शकतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्हणून त्याला केजीपासून इंग्रजीचे धडे शिकवण्यास प्रारंभ केल्या जाते. सध्या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे की, प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले की त्याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही. परंतु, वास्तव काही उलट आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मुलामुलींच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात. त्यास घोकंपट्टी किंवा वारंवार अभ्यास करावे लागत नाही. विषयाची संकल्पना मुलांना कळाली तर ते अगदी बिनधास्तपणे व्यक्त करू शकतात आणि त्यासाठी मातृभाषेतील टापटिपपणा आणि होमवर्क पूर्ण करण्याची पद्धत एवढ्या दोनच बाबी काटेकोरपणे पाळल्या जातात. शिकवणारी तज्ज्ञमंडळी उपलब्ध नसल्यामुळे थातूरमातूर शिकवले जाते. याकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्या जाते. पालकांकडून भरपूर प्रमाणात फिसच्या स्वरूपात पैसा उकळणे आणि त्या बदल्यात मात्र त्या मुलांना काहीच मिळत नाही. हे वास्तव चित्र आहे. याउलट एखादी इंग्रजी शाळा असू शकते जे की पालक व विद्यार्थ्यांच्या सर्व आशा पूर्ण करू शकेल. मात्र, याबाबीमुळे मुलांवर अपण अन्याय करत नाही का? याबाबीचा विचार कोणताही पालक करताना आढळून येत नाही. याबाबतीत समाजातील काही शिक्षणतज्ज्ञ किंवा जाणकार लोकांनी पालकांचे योग्य मार्गदर्शन करून त्यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबवणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्यमात शिकणार्या मराठी मुलाची भाषा जर ऐकायला मिळाली तर त्याची फारच कीव येते. कारण त्यांना मराठी शब्दांचे अर्थ नीट कळत नाहीच शिवाय अक्षरांचे लेखनसुद्धा नियमानुसार करत नाहीत.
पालक वर्ग नेहमी शेजार्यांशीच तुलना करत असतात. संत तुकाराम महाराज यांनी शेजार्यावर प्रेम करा असा संदेश दिला आहे. मात्र, ही मंडळी शेजार्यांशी नेहमी तुलनात्मक दृष्टीने पाहते. शेजार्याचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकत असेल आणि रेन रेन कम अगेन म्हणत असेल तर आपले मूलसुद्धा असे गीत म्हणावे, असे त्यांना वाटते. परंतु, त्या इंग्रजीच्या मुलांना रेन रेन कम अगेनचा अर्थ कळत नाही तो फक्त यांत्रिक पद्धतीने गात असतो. परंतु, आपला मराठी शाळेतील मुलगा ‘येरे येरे पावसा’ म्हणताना त्याच्या चेहर्यावरचे भाव स्पष्ट दिसतात. कारण त्याचा अर्थ त्याला कळालेला असतो. लहान वयात जी भावना, संकल्पना स्पष्ट होते ती आयुष्यभर सोबत राहते तसेच संकल्पना समजून घेण्यासाठी मातृभाषा कधीच ओझे वाटत नाही इंग्रजी सारखी. इकडे मराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांची स्थिती खूपच चांगली आहे, असेही छाती ठोकून सांगता येत नाही. कारण येथील मुलांची स्थितीसुद्धा मराठीबाबतीत फारच वाईट आहे. मराठी भाषेला नीट समजून न घेता दरवर्षी एका नवीन वर्गाची पायरी चढत शाळेच्या बाहेर पडलेला जेव्हा समाजात व्यवहार करण्यास प्रारंभ करतो निरक्षर व्यक्तीपेक्षा साक्षर व्यक्तीच मराठी भाषेला पदोपदी मारत असताना आढळून येतो.
मात्र, (मातृ) देवो भव, कार अपघातात त्यांचा अंत्य (अंत) झाला, पाणी हे द्रव्य (द्रव) आहे. आज शिक्षक दीन (दिन) आहे, सचिनचा कर्म (क्रम) सौरभनंतर येतो इत्यादी वाक्याचे बारीक निरीक्षण केल्यास कंसातील शब्दामुळे वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो. मात्र, भाषेचे ज्ञान नसलेले किंवा अर्धवट ज्ञानी मंडळी एक प्रकारे भाषेचे चिरफाड करून वाक्याचे अनर्थ करून टाकतात. हे म्हणजे कसे आहे, गाडी नीट चालवता येत नसलेल्या व्यक्तीच्या हातात गाडी देऊन अपघात करून घेण्यासारखे नाही का? ज्याप्रकारे गाडी चालवण्यासाठी परवानाची गरज भासते अगदी त्याच प्रकारे भाषेची मांडणी करणार्या व्यक्तीला विशेष ज्ञान असल्याचा परवाना आवश्यक नाही काय?
लहानपणापासून मुलांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यात वारंवार सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी प्रत्येक पालकांनी घेणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेतून शिक्षण घेताना मुलांना मराठीच्या जास्तीत जास्त शब्दाची तोंड ओळख कशी होईल? याचे नियोजन प्रत्येक भाषा विषय शिकवणार्या शिक्षकांनी केले पाहिजे. शब्द पाहिले, ऐकले आणि लिहिले तरच त्याच्या कायम स्मरणात राहील. मराठी शब्दांबाबतीत अगदी प्राथमिक शिक्षणाच्या पायापासून श्रवण भाषण, वाचन आणि लेखन या (ङडठथ) चार टप्प्यानुसार चालते आणि शिक्षकांचे सूक्ष्म निरीक्षण असेल तर मुलांमध्ये भाषेचे फार कमी चुका होतील. परंतु, विशेष करून येथेच दुर्लक्ष केल्या जाते आणि भविष्यात याच मुलांच्या हातून भाषेची चिरफाड होताना दिसून येते. मराठी भाषा फार सोपी वाटत असेल तरी या विषयात अनुत्तीर्ण होणार्यांची संख्या फार मोठी आहे. कारण स्वत:च्या भाषेत या मुलांना वर्णन करता येत नाही. त्यांना वेळेवर पर्यायी अर्थपूर्ण शब्द आठवत नाहीत किंवा खरा शब्द कसा आहे? हेही लक्षात येत नाही.
भाषेनुसार सन 1960 साली मराठी राज्याची निर्मिती झाली. परंतु, गेल्या पन्नास वर्षांत मराठीचा व्हावा तेवढा विकास झाला नाही. कारण या समस्येकडे कुणीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत. यासाठी समाजातील प्रत्येक घटक तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे मराठीची प्रगती व्हावी, त्याचा विकास व्हावा, त्याची चिरफाड होऊ नये असे वाटत असले तर प्रत्येकाने आज जागे होणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेतून विशेष करून मराठी भाषा शिकवणार्या शिक्षकांनी याविषयी गांभीर्याने दक्षता घेऊन मुलांच्या भाषिक कौशल्याचा विकास करावा. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये अनुलेखन, तिसरी व चौथ्या वर्गात शुद्धलेखन आणि पाचवी ते आठव्या वर्गापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना शुद्धलेखन योग्यप्रकारे करता यावे, असा किमान उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास मुलांमध्ये वारंवार होणार्या चुका नक्कीच टाळता येतात. बहुतांश वेळा मुलांची श्रवण प्रक्रिया योग्यप्रकारे विकसित न झाल्यामुळे समान आवाजाच्या शब्दात मुले घोळ करतात जसे खाक-काक, मखर-मकर, खेळ-केळ, भार-बार, घार-गार, झरा-जरा, झाग-जाग, धार-दार, भाई-बाई, साफ-साप, फळ-पळ, संग-संत, बंध-बंद, फर-पर, खल-कल, भाग-बाग, साथ-सात, पथ-पत, कोश-कोष इत्यादी शब्द ज्यांची ध्वनी जवळपास सारखी वाटते आणि शब्दाचा अर्थ बदलतो. यानंतर मराठीत असेही काही शब्द आहेत ज्यांच्या -हस्व व दीर्घ इकार व उकारमुळे वाक्याचा अर्थच बदलून जातो. जसे की आदी-आदि, आयत-आयात, आर्त-आर्द, स्त्री-इस्त्री, कोश-कोष, दिन-दीन, नियत-नीयत, केशर-केसर, पास-पाश, पिक-पीक, बहु-बहू, लक्ष-लक्ष्य, विष-वीस, चालक-चालाक इ.अशा बारीकसारीक बाबींकडे विषय शिक्षकांनी लक्ष दिल्यास मुलांच्या मराठी लेखनात नक्कीच सुधारणा होऊ शकेल.
मराठी भाषेचा विकास व्हावा व प्रगती व्हावी, असे मनातून वाटत असले तर प्रत्येकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. शालेय वयात इंग्रजी शब्दार्थ पाठांतर करत असल्याचे आपणा सर्वांना आजही आठवते. मात्र, मराठी शब्दार्थ पाठांतर आपण करतो का? अर्थातच याचे उत्तर नाही असेच येते. इंग्रजी शब्दाची जास्तीत जास्त ओळख व्हावी म्हणून ऑक्सफर्डची डिक्शनरी प्रत्येकजण एकदा तरी हाताळलेला असतो. मात्र, मराठीची शब्दासंपत्ती वाढवी म्हणून निदान मराठी विश्वकोषाचे खंड हे दूरचीच गोष्ट आहे निदान वसंत आबाजी डहाके यांचा शालेय मराठी शब्दकोशाचा शंभरामागे एखादा मराठी व्यक्ती हाताळतो. मराठी भाषेसाठी ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यास्तव प्रत्येकाने आपली शब्दसंपत्ती कशी वाढवता येईल याचा जरूर विचार करावा. यासाठी मुलांना लहानपणापासून विविध प्रकारचे मराठी शब्दकोडे सोडवण्याचा छंद कसा लागेल याकडे विशेष लक्ष द्यावे. वारंवार कोडे सोडवल्यामुळे खेळत खेळत मराठी भाषेच्या अनेक शब्दांची व त्याच्या अर्थाची ओळख होते. मराठी भाषेच्या विकासासाठी व भाषेची चिरफाड टाळण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस दिनांक 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केल्या जाते. त्यानिमित्ताने प्रत्येकाने मराठीत बोलेन, मराठीत लिहिन आणि मराठीतच चालेन, असा एक संकल्प करू. या मराठीच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी तेव्हाच कुठे मराठी जगेल.
– नागोराव सा. येवतीकर
प्राथमिक शिक्षक, ता. धर्माबाद
9423625769