पुणे । मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते, असा सवाल करत मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे. 56 इंची छातीसमोर उभे राहून ‘अभिजात’चा प्रश्न लावून धरण्याची हिंमत नसेल तर फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सरकारच्या उदासीनतेचा खरपूस समाचार घेतला.
साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार व चित्रकार सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या 91 संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. मिलिंद जोशी, प्रा. हरी नरके, कृष्णकुमार गोयल, चित्रकार सुरेश लोटलीकर, भारत देसडला, सचिन ईटकर, श्याम देशपांडे, रोहित पवार, कैलास भिंगारे आदी उपस्थित होते.
मराठीसाठी राजकारण केले पाहिजे
मराठीचे राजकारण नव्हे, तर सर्वांनी मिळून मराठीसाठी राजकारण केले पाहिजे. अभिजात दर्जामुळे मराठी शाळा, मराठी शिक्षणाला प्रतिष्ठा येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी उपलब्ध होईल. मराठी ज्ञानभाषा आहेच; तिला रोजगारक्षम करण्यासाठी अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे, असे प्रा. हरी नरके म्हणाले. कैलास भिंगारे यांनी प्रास्ताविक केले.
लोकचळवळ उभारून लढा
सबनीस म्हणाले, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा राजकारण्यांना मराठीचा पुळका असेल तर अभिजातच्या दर्जाबाबत ते गप्प का? शिक्षणमंत्री विनोद तावडे मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेताहेत, हा अतिशय क्रूर विनोद आहे. लोकचळवळ उभारून मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी लढा दिला पाहिजे. मराठी राजभाषा दिनानिमित्त 27 फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे.देशमुख म्हणाले, अभिजात भाषेचा लढा संयमाने आणि निग्रहाने लढायचा आहे. देशात भाषिक राजकारण सुरू आहे. इंग्रजी शाळा वाढत आहेत आणि मराठी शाळा ओस पडत आहेत. गावोगावी ग्रंथालयांची उभारणी केली पाहिजे. मराठी प्रशिक्षणाचा कायदा अस्तित्वात आणला पाहिजे.