मुंबई: आज शुक्रवारी ७ रोजी बहुचर्चित ‘म्होरक्या’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर ”म्होरक्या’ने मोहोर उमटवले आहे. मात्र ‘म्होरक्या’ला थिएटरच मिळाले नसल्याचे चित्र मुंबईतल्या जवळपास सगळ्याच मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमध्ये पाहायला मिळाले. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांकडून मराठी सिनेमाची गळचेपी होण्याचे हा प्रकार आहे.
ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर हा सिनेमा भाष्य करतो. दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत.
मराठी सिनेमात आशयघन सिनेमांची निर्मिती होतेय. दर्जेदार सिनेमा रसिकांच्या भेटीला येतायत.. मात्र मुंबईत मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर मालकांकडून होणा-या गळचेपीमुळं सिनेमा रसिकांपर्यंत पोहचत नाही… याहून मोठं दुर्देव ते कोणतं. त्यामुळे मराठी सिनेमाची ही गळचेपी कधी थांबणार असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.