मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीसोबत येण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ८० तासातच भाजपचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमिळून महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ शपथविधीत मात्र अजित पवारांना स्थान देण्यात आले नाही. आता होणाऱ्या विस्तारत अजित पवारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान मला उपमुख्यमंत्री पद मिळावे ही कार्यकर्त्यांची भावना आहे, परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे गेल्याने उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोण उपमुख्यमंत्री होणार याची उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.