मला घाबरवू नका, खुर्चीवरून खाली खेचेन

0

नवी दिल्ली । राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. भाजप आणि संघाच्या नेत्यांनो मी तुम्हाला दिल्लीतील खुर्चीवरून खाली खेचेन, यासाठी भले मला माझी स्थिती काहीही होवो. याद राखा, मला घाबरवण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि संघाला सुनावले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझा बदला घेत आहेत. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशी थेट धमकीही त्यांनी दिली. ते माझ्या पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल करताना लालूप्रसाद यादव म्हणाले की, मोदी सरकारचे जर हेच धोरण राहिले, तर 5 वर्षेही हे सरकार टिकणार नाही. येत्या 27 ऑगस्ट रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर एका विशाल मोर्चाचे आयोजन केले जाणार असून, यात समान विचारसरणीचे सर्व नेते उपस्थितीत असतील आणि ते आपली पुढील रणनीती निश्‍चित करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या मोर्चासंबंधी लालूप्रसाद यादव यांनी 17 मे रोजी सोनिया गांधी यांना फोनवरून या मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली होती. जर आपण भाजपविरोधात एकत्र आलो नाही, तर आपण संपुष्टात येऊ, असे लालूंनी सोनियांना म्हटले होते. दहा मिनिटे या दोघांमध्ये चर्चादेखील झाली होती तसेच एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यादव यांच्या हवाल्याने म्हटले की, मॅडम तुम्ही 27 तारखेला अवश्य या. भाजपला पराभूत करता येऊ शकेल, यासाठी मी समान विचारधारा असलेल्या पक्षांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जरूर आले पाहिजे. जर तुम्ही एखाद्या कारणामुळे येऊ शकला नाहीत, तर प्रियांका गांधींना पाठवून द्या. यामुळे लालूंनी अप्रत्यक्षरीत्या राहुल गांधींना या मोर्चात सहभागी न होण्याचा संदेश दिल्याचे बोलले जाते आहे.

दरम्यान, 16 मे रोजी प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी संपत्तीप्रकरणी दिल्ली आणि गुरूग्राम येथील 22 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. गेल्या 40 दिवसांपासून भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे लालूप्रसाद यादव कुटुंबीयांवर बेनामी संपत्तीबाबत नवनवे खुलासे करत आहेत. त्यानंतर त्यांनी भाजप आणि भाजप समर्थित मीडियावर निशाणा साधला होता.भाजपमध्ये लालूचा आवाज दाबण्याची हिंमत नाही. मी धमक्यांना घाबरणारा नाही. जोपर्यंत शेवटचा श्‍वास असेल तोपर्यंत अशा शक्तींविरोधात लढत राहील. या वेळी त्यांनी भाजपचा नवा पार्टनर असा उल्लेखही केला होता. पण तो कोणाला उद्देशून केला हे सांगणे त्यांनी टाळले. त्यामुळे आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.