मशिदींवरच्या भोंग्याविरोधात सोनू निगमचा सूर

0

मुंबई – गायक सोनू निगम सध्या त्याच्या एका ट्विटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर शब्द जरा जपूनच वापरावेत याचा अंदाज आता सोनू निगमला येत असावा. कारण त्याच्या एका ट्विटने धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणार्‍या या धार्मिक रुढी कधी थांबणार? असे ट्विट गायक सोनू निगम याने केले होते.

सोनूच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली. काहींनी सोनू निगमला धारेवर धरले. तर काही चाहत्यांनीही याबाबत खेद व्यक्त केला. मी तुमचा चाहता आहे. पण, तुमचे हे अजान बद्दलचे विधान खरंच वेंधळेपणा आहे. तुम्ही इतर धर्मांचा आणि रुढींचाही आदर केला पाहिजे कारण भारत एक लोकशाही राष्ट्र आहे, असे म्हणत एका चाहत्याने सोनूच्या ट्विटवर थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. विविध धार्मिक रुढींना समजून त्यांचा आदर करायला शिक, असा सल्लाही सोनूला देण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर काही नेटिझन्सनी थेट शब्दांमध्ये तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली नाहीये. कानात कापूस घालून शांतपणे झोप, असेही म्हटले आहे.

सोनूच्या या ट्विटला विरोध झाल्यानंतर त्याने पुन्हा एक नवे ट्विट केले. त्या ट्विटमुळेही अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. जेव्हा मोहम्मद पैंगबर यांनी इस्लामची स्थापना केली होती तेव्हा विजेची सोय नव्हती. तर मग, एडिसनच्या संशोधनानंतर हे चोचले कशाला हवेत? असा प्रश्‍न सोनू निगम याने नवीन ट्विट करत उपस्थित केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर यानंतर सोनूने या सर्व प्रकाराला गुंडगिरीचेही नाव दिले आहे. जर कोणत्या मंदिरात किंवा गुरुद्वारामध्येही त्या धर्माचे आचरण न करणार्‍या लोकांना उठवण्यासाठी अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जात असेल, तर त्यावरही माझा विश्‍वास नाही. सोनू निगम आणि त्याच्या या ट्विटचा सध्या सर्व स्तरांतून विरोध होत असून त्याच्या चाहत्यांनीही याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यासंदर्भात येत्या काळात सोनू निगमला काही अडचणींचा सामना करावा लागतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.