महादेव तांड्यानजीक गव्हाची वाहतूक करणारा ट्रक पेटला

0

आग विझवण्याऐवजी काहींनी लांवबला गहू : तालुका पोलिसात अकस्मात आगीची नोंद

भुसावळ : गव्हाची वाहतूक करणार्‍या ट्रकच्या स्टार्टरमध्ये बिघाड होवून त्याने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागल्याने गहू जळाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास महादेव तांड्यानजीक घडली. या घटनेने जामनेर रोडवरील वाहतूक पहाटे चार ते सात वेळेत ठप्प झाली. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या आगीत ट्रकसह सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. तालुका पोलिसात या प्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. एकीकडे ट्रकला आग लागली असतना ती आटोक्यात आणण्याऐवजी काहींनी चक्क ट्रकमधील गहू लांबवण्यात धन्यता मान्यता आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे.

ट्रक पेटल्याने वाहतूक ठप्प
मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील प्रधान गावातून गहू घेवून निघालेला ट्रक (एम.पी.12 एच.ओ. 192) हा औरंगाबादमधील अंजली गावाकडे निघाला असताना भुसावळ-जामनेर दरम्यानच्या महादेवतांडा येथे आल्यानंतर ट्रक स्टार्टर गरम झाल्यानंतर त्याला आग लागली व पाहता-पाहता ट्रकनेही पेट घेतला. या घटनेनंतर ट्रक चालकासह क्लिनरने पळ काढला. आजूबाजूच्या काही ग्रामस्थांनी माती टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आग विझली मात्र तोपर्यंत ट्रकमधील गहू जळून खाक झाला. या ट्रकमध्ये 18 टन (285 पोते) गहू असल्याचे ट्रक चालक शेख फिरोज शेख शहा यांनी सांगितले.