महापौरांच्या अध्यक्षतेखाली महापरिनिर्वाण दिनासाठी समन्वय समिती

0

मुंबई । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी देशभरातील लाखो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येतात. या अनुयायांना मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यासाठी मुंबईच्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्याचा तसेच पुढील वर्षापासून महापरिनिर्वाण दिनासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी येथे पुरवण्यात येणार्‍या विविध नागरी सेवा – सुविधांबाबत मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, पोलिस अधिकारी व आंबेडकरी संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील लाखो भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येतात.

जी/उत्तर विभागातर्फे वितरित करण्यात येणाऱया स्टॉलमध्ये कंत्राटदारांकडून अतिरिक्त शुल्क आकारु नये अशी सूचना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी प्रशासनाला केली. तसेच हे स्टॉल 7 डिसेंबरपर्यंत कायम ठेवावे, अशी सूचनाही केली. वरळीच्या जांभोरी मैदानात किंवा आंबेडकर मैदानात अतिरिक्त निवासाची व्यवस्था तसेच दादर स्थानकापासून वरळी स्मशानभूमीतील माता रमाई स्मृतीस्थळ व राजगृहापर्यंत बेस्ट बसची सुविधा उपलब्ध करावी, बसस्टॉपवरील फलकातून आकारण्यात येणा़र्‍या टॅक्समधून सूट द्यावी. तसेच महापरिनिर्वाण दिनासाठी स्वतंत्र बजेट हेड ओपन करुन पुढच्या वर्षापासून 5 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी सूचना जाधव यांनी केली. त्यावर महापौर यांनी पुढील वर्षांपासून महापरिनिर्वाण दिनासाठी अर्थसंकल्पात 5 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल असे जाहीर केले.

राहण्याची सोय
या ठिकाणी दरवर्षी वाढती संख्या लक्षात घेता शिवाजी पार्क व्यतिरिक्त लगत असलेल्या मैदांनामध्येही अनुयायांसाठी निवार्‍याची सुविधा पुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी असे निर्देश महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केली. बैठकीला उपस्थित आंबेडकरी संघटनांनी केलेल्या सुचनांचे महापौरांनी स्वागत करून महापालिका प्रशासनाने त्या सूचना अमलात आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.