उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक उद्या होणार असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्या ‘साई’ पक्षाच्या जोरावर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्या साई पक्षाची आपल्याकडे नोंदच नसल्याच कोकण विभागीय आयुक्तांनी उल्हासनगर महापालिकेला लेखी स्वरूपात कळवले आहे. 5 एप्रिलला उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीत साई पक्षाचे सदस्य मतदानाच्या प्रक्रियेतून बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट फायदा शिवसेनेला होणार असून भाजपचे महापौरपदाचे स्वप्न धुळीला मिळण्याची चिन्हे आहेत.
उपमहापौरपद साई पक्षाला देण्याच्या बोलीवर भाजपने महापौरपदावर दावा केला. परंतु, साई पक्षाने गटस्थापनेच्या केलेल्या दाव्यात पक्षाची घटनाच जोडलेली नसल्याचा आरोप 25 जागा जिंकणार्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. शिवसेनेच्या या पत्रानंतर कोकण आयुक्तांनी उल्हासनगर महापालिकेला एक पत्र पाठवले असून यात कायदेशीर गटनोंदणी आणि अधिकृतरीत्या महापालिका पक्ष म्हणून नोंदणी केलेल्या पक्षाच्या नगरसेवकांची यादीही जोडण्यात आली आहे. या पत्रात साई पक्षाची मात्र आपल्याकडे नोंदणी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्यांच्या नोंदणी नसलेल्या 12 नगरसेवकांची स्वतंत्र यादी जोडण्यात आली आहे. साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन ईदनानी यांनी मात्र आपला पक्ष अधिकृत असल्याचे सांगितले आहे.
कोकण आयुक्तांच्या या पत्रामुळे साई पक्षाचे सर्व नगरसेवक तूर्तास अपक्ष ठरले आहेत. या सर्वच्या सर्व नगरसेवकांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ शकतो, किंवा पक्ष म्हणून नव्हे, तर अपक्ष म्हणून मतदान करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. यापैकी काहीही झाले तरी त्याचा फायदा शिवसेनेचाच होणार आहे. त्यामुळे आता बुधवारी पाच तारखेला होणार्या महापौरपदाच्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेला होणार लाभ
सलग 15 वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या उल्हासनगर महापालिकेत भाजप कलानी गटाच्या साथीने 32 जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला. मात्र, अपक्षांच्या साथीनेही 39 ही मॅजिक फिगर भाजपला गाठता येत नसल्याने त्यांनी 12 जागा निवडून आणणार्या साई पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता उपरोक्त प्रकारामुळे शिवसेनेचे पारडे जड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून शिवसेनेला सत्तास्थापने शक्य होणार आहे.