मुंबई। समृध्दी महामार्गाने मुंबई नागपूर ही दोन्ही महानगरे जोडण्यात येणार आहे. या महामार्गामुळे 24 जिल्हे एकमेकांशी जोडली जाणार असून कृषी प्रक्रिया उद्योगांची साखळीच या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2017 दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिकस्तरावरील प्रदर्शनामध्ये राज्यांनी सहभागी व्हावे यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना माहिती देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रापासून करत येथील हॉटेल ताज विवांतमध्ये या उपक्रमासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर बादल, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागाचे सचिव जगदिशप्रसाद मिना, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार आदी उपस्थित होते. या महामार्गामुळे शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ, उद्योगाचा हातभार लागणार आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या ‘किसान संपदा योजने’च्या माध्यमातून राज्याला मेगा फुड पार्क, शीतगृहे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
देशामध्ये एकूण 42 मेगा फूड पार्क मंजूर
अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामुळे भुकलेल्यांना अन्न मिळेल. देशामध्ये एकूण 42 मेगा फूड पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे तर 33 प्रकल्प प्रगतीपथावर आहे. पुढील दोन वर्षांत शीतसाखळी प्रयोगाचे 100 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात 23 शीतगृहे आणि तीन मेगा फूड पार्क मंजूर करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री कौर यांनी यावेळी सांगितले.
मसाला निर्यातीत महाराष्ट्र अग्रेसर
356 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले तीन मेगा फूड पार्क राज्यात कार्यान्वित होणार असून त्या माध्यमातून 25 हजार जणांना रोजगार तर सुमारे 17 हजार शेतकर्यांना स्थानिक बाजारपेठ मिळणार आहे. राज्यात गटशेतीला प्राधान्य देण्यात येत असून ठिबक सिंचन योजनेतून पाण्याचे नियोजन व बचत करण्यात येत आहे. खाजगी व्यापार्यांना थेट परवाने देऊन राज्यात शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ई-ट्रेडिंगच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे कृषिमंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले.
मुल्य साखळी वाढविणार
उपाययोजनांसोबतच मुल्य साखळी (व्हॅल्यू चेन्स) आवश्यक असून ही साखळी अधिक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाने सुरु केलेल्या अनेक योजना राज्यात यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. उद्योजकांशी सातत्याने संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविले जात आहे. केंद्र शासनाच्या योजना राज्यात यशस्वी करण्यासाठी टीम म्हणून काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अन्न प्रक्रिया उद्योग विकासात भर घालत असून या क्षेत्रात अमाप संधी आहे.