महामार्गावर बसच्या धडकेत पादचारी वृध्दाचा मृत्यू

0

सलग दुसर्‍या दिवशी महामार्गाने घेतला दोन बळी ; अपघातानंतर बसचालक पोलीस ठाण्यात जमा

जळगाव ः नियमितपणे मॉर्निंग वॉक नंतर घराकडे परतत असलेल्या पादचारी रज्जाक मोहम्मद पटेल वय 74 रा. ओमशांतीनगर, खोटेनगर या वृध्दाला बसने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता महामार्गावर घडली. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

खोटेनगर परिसरातील ओम शांतीनगरात रज्जाक पटेल हे पत्नी सोफिया मुलगा हारुन यांच्यासह वास्तव्यास होते. हारुन हा मोहाडी येथील माध्यमिक विद्यालयात चित्रकला विषयाचे शिक्षक आहे. मुलगी गुलिस्ता हीचा विवाह झाला असून ती बारडोली, गुजरात येथे सासरी नांदते.

बस वाहकाने तत्काळ रिक्षातून रुग्णालयात हलविले
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी रज्जाक पटेल मॉर्निंग वॉकसाठी महामार्गावर फिरायला गेले होते. यानंतर घराकडे पररत असताना जळगावकडे येत असलेल्या कल्याण रावेर बसने (एम.एच. 14, बी.टी.2381) रज्जाक पटेल यांना धडक दिली. यात पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना बसवरील वाहक किशोर मधुकर सोनवणे यांनी तत्काळ रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्याला अ‍ॅक्सॉस बे्रन या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यात रक्तश्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघातानंतर बसचालक पोलीस ठाण्यात जमा
अपघातानंतर बसचालक डिगंबर महाजन हे पोलीस ठाण्यात जमा झाले होते. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. बस ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात जमा केली. खाजगी दवाखान्यातून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रज्जाक यांना मृत घोषित करताच पत्नीसह मुलाने आक्रोश केला. बारडोली मुलगी हिस घटना कळविण्यात आली असून ती जळगावकडे येण्यास निघाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात

महामार्गावर सलग दुसर्‍या दिवशी बळी
रविवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कंपनीत जात असताना जैन इरिगेशनचे सुपरवायझर राजेंद्र फत्तेसिंग वतपाल वय 52 याचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना विद्यापीठाच्या प्रवेशव्दारसासमोर खड्डा चुकवण्यासाठी प्रयत्नातील दुचाकीस्वार नीलेश अशोक ठाकरे (वय 34, रा. निवृत्तीनगर) याला कारने जोरदार धडक दिली होती. वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. दरम्यान सोमवारी रज्जा पटेल यांना बसने धडक दिल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी समांतर रस्ता असता कदाचित रज्जाक पटेल याचा जीव वाचला असता, मात्र समांतर रस्ते नसल्याने आणखी किती बळी जाणार या भाषेत रोष व्यक्त केला.