नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील नेते उपस्थित आहेत. या अधिवेशनात भाजपच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी महाविकास आघाडीवर विशेषत: शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी एक अवास्तव आणि अनैसर्गिक आहे. हे अनैसर्गिक महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे भाजपाला संधी प्राप्त झाली असून पूर्ण ताकदीने आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे सांगत करत भविष्यात युती न करता महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येईल, असा विश्वास जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला.
भाजपाने आपली विचारसरणी बदलली नाही. इतर पक्षांनी बऱ्याचदा प्रसंगी आपली वैचारिक भूमिका बदलली आहे. आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मात्र, ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ यासाठी वचनबद्ध आहोत, असेही जे. पी. नड्डा म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल
महायुतीच सरकार येणार असल्याचे वाटत असताना विश्वासघात झाला. जनादेश होता की भाजप आणि शिवसनेने मिळवून सरकार स्थापन करावे. मात्र त्या जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रामध्ये एक अभद्र सरकार आले आणि अनैतिक युती झाली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह जवळपास अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला असून, या अधिवेशनामुळे पक्षाला लागणारी गळती थांबणार का? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.