महाराष्ट्रात होणार ७५ हजार रॅपिड टेस्ट

0

मुंबई: महाराष्ट्रात करोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहेत. त्याचबरोबर घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी ६३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे. राज्याचा करोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरुवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे ७ दिवसांवर गेला आहे. हा दर २० ते २५ दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल, असे ते म्हणाले.