नवी दिल्ली:श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून अलर्ट केले आहे.
कर्नाटक पोलिसांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या माहितीनंतर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी, गोवा या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अलर्ट राहण्यास सांगितले आहे. ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला त्याने स्वतः एक ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले आहे. स्वामी सुंदर मुर्ती असे स्वतःचे नाव सांगताना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता बंगळुरू शहर पोलिसांच्या कन्ट्रोल रुमला त्याने फोन केला होता. यामध्ये त्याने सांगितले होते की, देशातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.
यावेळी दहशतवादी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवून आणू शकतात असेही त्याने म्हटले आहे. तामिळनाडूच्या रानाथपुरम येथे १९ दहशतवादी असल्याचाही त्याने दावा केला आहे. या फोननंतर कर्नाटक पोलिसांनी सर्व संबंधीत राज्यांच्या पोलिसांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, तामिळनाडूनच्या चेन्नई पोलिसांनाही एक फोन आला होता. यामध्ये रामेश्वरमधील प्रसिद्ध पंबन सी पुल उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या फोन नंतर पोलिसांनी संबंधीत पुलावर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले होते. तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांनाही त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.