महाराष्ट्र सरकारचा चीनला दणका: पाच हजार कोटींचा करार रद्द

0

मुंबई:गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. या संघर्षात 20 भारतीय सैनिक शहीद झालेत. 40 पेक्षा अधिक चिनी सैनिक मारले गेलेत. त्यामुळे भारत आणि चीनचे संबंध ताणले गेलेत. राज्यातील महाविकास आघाडीने देखील चिनी कंपन्यांबरोबर तीन मोठ्या करारांना स्थगिती दिली आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (दोन) या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. “केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारांवर आधीच (भारत चीन सीमेवर २० जवान शहीद होण्याआधीच) सह्या झाल्या होत्या.
मागील सोमवारी (१५ जून रोजी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीला चीनचे भारतीय दूत सन विडोंग सुद्धा उपस्थित होते. यावेळी ग्रेट वॉल मोटर्स (जीएमडब्ल्यू) या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर ३ हजार ७७० कोटींचा करार झाला. या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगावमध्ये वाहननिर्मिती कारखाना उभारणार होती. महाराष्ट्र सरकार आणि चिनी कंपन्यांदरम्यान झालेल्या तीन करारांपैकी हा सर्वात मोठा करार होता. त्याच प्रमाणे पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या चिनी कंपनीच्या सोबतीने एक हजार कोटींचा कारखाना सुरु करण्यासंदर्भात करार केल्याचे सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. या करारामधून दीड हजार जणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

याचबरोबर हेन्गेली इंजिनियरिंगने राज्य सरकारबरोबर २५० कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला होता. तळेगाव येथील कंपनीचा दुसऱ्या टप्प्यात विस्तार करण्यासंदर्भाती या करारामधून १५० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. करोनानंतर राज्यातील अर्थचक्राला गती देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० च्या माध्यमातून सरकारने गुंतवणूकदारांबरोबर करार केले. याअंतर्गत १२ करार करण्यात आले. त्यामध्ये सिंगापूर, दक्षिण कोरिया, अमेरिकन कंपन्यांबरोबरच भारतीय कंपन्यांबरोबरही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. आता तीन करार स्थगित करण्यात आल्यानंतर उर्वरित नऊ करारांवर काम सुरु असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.

जानेवारी महिन्यामध्येच चीनच्या जीएमडब्यूने तळेगाव येथील अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सचा कारखाना विकत घेण्यासंदर्भात करार केला होता. जीएमडब्यू या कारखान्यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत होते. “हा तळेगावमधील सर्वाधिक यांत्रिक प्रकल्प असेल.

भारत आणि चीनदरम्यान लडाखमधील पूर्वेकडील गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनची आर्थिक नस आवळण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरु केले आहेत.