महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात असमर्थ, ८५ ऐवजी २७ ट्रेनच सुटल्या – पीयूष गोयल

0

नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत १४५ पैकी ८५ ट्रेन सुटणे अपेक्षित होते. पण राज्य सरकारकडून प्रवाशांची व्यवस्था करण्यात न आल्याने फक्त २७ ट्रेनच सुटू शकल्या असे ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की, गरीब मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करावी असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पीयूष गोयल यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, महाराष्ट्राने १४५ ट्रेन मागितल्यानंतर आम्ही रात्रभर आढावा घेतला. यानंतर योजना तयार करुन १४५ ट्रेन पोहोचवल्या. महाराष्ट्रात १४५ ट्रेन उभ्या आहेत, पण त्यांच्यासाठी प्रवासीच नाहीत. महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरत आहे. त्यांची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महाराष्ट्र सरकारने जेवढ्या ट्रेन मागितल्या तेवढ्या आम्ही दिल्या. पण प्रवासीच नसल्याने विनाप्रवासी ट्रेन पुन्हा परतत आहेत असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने प्रवासी मजुरांच्या अडचणीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीयूष गोयल यांनी केला आहे. दुर्भाग्य आहे की अनेक ट्रेन मोकळ्या आहेत, अन्यथा लाखो लोक आज आपल्या घरी पोहोचले असते असेही पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.