मुंबई | स्वच्छ भारत अभियान राबविण्यात महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविताना महाराष्ट्रात लोकचळचळ निर्माण झाली म्हणून हे शक्य झाले. सन २०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे केले.
पेयजल व स्वच्छता मंत्रालय भारत सरकार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छथॉन’ १.० या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या सह सचिव व्ही. राधा, राज्य सॅनिटेशन प्रमुख रुचेस जयवंशी, युनिसेफच्या क्षेत्रिय कार्यालयाचे प्रमुख श्रीमती राजेश्वरी चंद्रशेखर, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
श्री. लोणीकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली त्यानंतर स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांनी सहभाग घेतला यामुळेच राज्यात स्वच्छतेचे उत्तम काम झाले आणि देशभरात या चळवळीत महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. राज्यात ११ जिल्हे, १५६ तालुके, १८ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. राज्यात कुटुंब संवाद, लोटाबंदी असे विविध उपक्रम राबविण्यात आले असल्याचे सांगून ते म्हणाले, सन २०१८ पर्यंत महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा.
‘स्वच्छथॉन’ हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी लोकांकडून नवनवीन कल्पना याव्यात हा या स्वच्छथॉन अभियानाचा उद्देश असल्याचे सांगून व्ही राधा पुढे म्हणाल्या, या स्वच्छथॉन’ १.० या अभियानांतर्गत शौचालयाचा वापर करणे, सामाजिक वर्तणुकीतील बदल, अवघड क्षेत्रातील शौचालय तंत्रज्ञान, शाळेतील शौचालय वापर, दुरुस्ती व देखभाल यावर मार्ग काढणे, मानवी वापरलेल्या वस्तूंची तांत्रिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि सुरक्षित वापर करणे, जलद गतीने या वस्तूंची विल्हेवाट लावणे याबाबत राष्ट्रीय पातळीवर मार्ग शोधणे या अनुषंगाने या अभियानांतर्गत काम करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल म्हणाले, मॅरॅथॉन शर्यतीप्रमाणे स्वच्छता अभियान ही मोठी शर्यत आहे आणि ती आपल्याला जिंकायची आहे त्यासाठीच प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.
युनिसेफच्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख श्रीमती राजेश्वरी चंद्रशेखर, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
‘स्वच्छथॉन’ अभियान देश पातळीवर तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात व्यक्ती व संस्था यांच्याकडून नवनवीन कल्पनांबाबत ऑनलाईन अर्ज २५ ऑगस्ट २०१७ पर्यंत मागविण्यात येणार आहेत (स्क्रीनिंग राऊंड). दुसऱ्या टप्प्यात आलेल्या अर्जातून १० वर्गवारीत ६० व्यक्ती व संस्था सहभाग घेतलेल्यांची यादी तयार करण्यात येणार आहेत. अंतिम टप्प्यात ८ व ९ सप्टेंबर २०१७ रोजी नवी दिल्ली येथे विजेते घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रस्ताविकात राज्य सॅनिटेशन प्रमुख रुचेस जयवंशी यांनी यावेळी दिली. राज्य माहिती शिक्षण व संवाद सल्लागार कुमार खेडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात स्वच्छतेमधील तज्ज्ञ व्यक्ती व वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले.