पुणे । शेती व्यवसाय फायदेशीर व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रेशीम शेती प्रभावी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्र हे रेशीम व्यवसायात देशात एक क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. महारेशीम अभियान 2018च्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मध्ये आयोजित कार्यक्रमास वस्त्रोद्योगचे अपर मुख्य सचिव उज्ज्वल उके, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्वोत्तम प्रादेशिक विभागाचा पुरस्कार औरंगाबादचे सहायक संचालक दिलीप हाके यांनी तर राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हा पुरस्कार औरंगाबादचे बी. के. सातदिवे यांनी स्वीकारला. याशिवाय पुणे प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. कविता देशपांडे, बार्टीच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, औरंगाबादचे क्षेत्र सहायक एम.पी.साळुंखे, समतादूत श्याम गंगाधर, हिंगोलीचे रेशीम विकास अधिकारी जी. एस. ढावरे,अमरावतीचे सहायकसंचालक एम.बी. ढवळे यांचाही पुरस्कार देऊन गौरव केला.
कणसे यांनी बार्टीच्या समतादूतांच्या माध्यमातून रेशीम संचालनालयाशी जोडले गेल्याचे नमूद करून शेतकर्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात यश मिळत असल्याचे सांगितले. देशात रेशीम उद्योगात महाराष्ट्र एक क्रमांकावर आणण्यासाठी सहकार्य करू, असेही ते म्हणाले. उज्ज्वल उके यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि समतादूतांच्या एकत्रित समन्वयाने रेशीम लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे सांगितले. भविष्यातही याच उत्साहाने उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकर्यांच्या आत्महत्येवर उपाय
देशमुख म्हणाले, मराठवाडा आणि विदर्भ हे विभाग आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. या भागातील बागायती क्षेत्र कमी आहे, शेतीचे उत्पादन कमी आहे, मालाला भाव, कर्जपुरवठा अशा अडचणींवर मात करत शेती केली जाते. रेशीम व्यवसाय हा फायदेशीर ठरणारा असून शेतकर्यांच्या आत्महत्येवर तो प्रभावी उपाय ठरेल. मराठवाडा आणि विदर्भ हे केंद्रबिंदू मानून या भागात रेशीम उद्योग वाढीसाठी प्रयत्न व्हावेत. गतवर्षीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करुन यंदा 30 हजार एकर रेशीमलागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्याचेही त्यांनी आवाहन केले.