मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शनिवारी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावर विरोधी पक्षाने टीका देखील केली. उद्धव ठाकरे यांनी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी ही दोनच लाखाची केली असल्याने भाजपने सभागृह त्याग केले. दरम्यान भाजप नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीचे स्वागत केले आहे. कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकरी समाधानी होणार नाही मात्र हा निर्णय स्वागतार्ह आहे असे खडसे यांनी सांगितले. कर्जमाफीचे निकष ठरलेल नाही, मात्र निकषाविना कर्जमाफी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होणार नाही असेही खडसे यांनी सांगितले. खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र मी पक्ष सोडणार नाही असे खडसे यांनी सांगितले.