अहमदाबाद । भारतीय रेल्वे महिला प्रवाशांसाठी असुरक्षित बनत असल्याचे वारंवार समोर येत आहेत. रेल्वेत एकाच महिन्यात दोन महिलांवर घडलेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आज अजून एका महिलेवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. जयपूर ते वांद्रे एक्स्प्रेसमध्ये एका महिलेवर चालत्या गाडीत बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वेमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय नेमके घडले?
9 जून रोजी जयपूर ते वांद्रे एक्स्प्रेसमध्ये स्लीपर बर्थ देतो, असे सांगून एका इसमाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्या इसमाने महिला प्रवासीला स्लीपर बर्थ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पँट्री कारमध्ये नेऊन बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. 12 जून रोजी पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे धावत्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशांवर बलात्कार करणे, मारहाण करणे, अतिप्रसंग करणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. परिणामी महिला प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
यापूर्वीच्या रेल्वेतील अत्याचाराच्या घटना
लखनऊमध्ये एका चालत्या गाडीत आरसीएफच्या जवानाकडून एका आजारी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेत जवानाने पीडित महिलेला बोगीमध्ये बंद करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्या जवानाला पोलिसांनी अटक केली आहे. त्या घटनेनंतर काही दिवसांतच सोलापूरला जाणार्या सोलापूर-पुणे पॅसेंजर या गाडीत काही गावगुंडानी एका महिला प्रवासीला आणि तिच्या सोबतच्या लोकांना जबर मारहाण केली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आज ही बलात्काराची घटना समोर आली आहे.