कोलकाता । टीम इंडियाच्या बहुतेक शिलेदारांना माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे हा खूपच कठोर शिस्तीचा वाटत असला तरी आपण त्यांच्याशी सहमत नसल्याचे भारताचा कसोटी यष्टिरक्षक रिद्धिमान साहाने स्पष्ट केले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अनिल कुंबळेला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनिल कुंबळे हा एक कठोर शिस्तीचा व्यक्ती आहे असा सर्वसाधारण समज झाला आहे, याकडे लक्ष वेधता आपल्याला तसे वाटत नसल्याचे साहाने सांगितले. कुंबळेशिवाय टीम इंडियाचा एकही खेळाडू तिथे दिसला नाही. ‘त्यांचं वागणं मला कठोर नव्हतं वाटत, कोच म्हणून कधी-कधी त्यांना कठोर व्हावे लागत होते. पण काही जणांना वाटत होतं की ते कठोर आहेत, तर काही जणांना तसं अजिबात नव्हतं वाटत. अनिल भाई कठोर आहेत असे मला वाटत नाही.’
रवी भाई हे नेहमीच आक्रमक
‘अनिल भाईंना नेहमी वाटायचे की, आम्ही मोठा (400, 500 किंवा 600 धावा) स्कोअर करावा आणि प्रतिस्पर्धी संघाला 150 के 200 धावांच्या आत बाद करावे. पण ते नेहमी शक्य नसते’, असे साहा हसत-हसत म्हणाला. ‘तर रवी भाई हे नेहमीच आक्रमक असतात. ते सांगतात की, जा आणि प्रतिस्पर्धी संघाला झोडपून काढा. मला दोघांमध्ये फक्त तेवढाच फरक जाणवतो. पण दोघेही सकारात्मक आहेत’, असेही साहा म्हणाला.