जळगाव : श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीने आयोजित केलेल्या ान्देशस्तरीय कृषी प्रदर्शनात पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी हजेरी लावली. व्यासपीठावर दोघे नेते एकत्र आल्यानंतर सत्तारांनी गुलारावांची प्रेमाने दाढी कुरवाळली मात्र कार्यक्रमाला आधीच सत्तार यांना झालेला उशिर झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन उरकून घेतल्याने सत्तार यांनी भाषणात नाराजी व्यक्त केली. गुलाबराव पाटील यांनी माझ्यासाठीही एखादा तास ठेवला असता तर बरे वाटले असते. इथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे, माझी गणती येरा गबाळ्यात करू नका, असा टोलाही गुलाबराव पाटील यांना लगावला.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील हे उठले आणि नियोजन समितीच्या बैठकीला निघून गेले.
बैठकीला उशीर झाल्याने निघाले पालकमंत्री
शुक्रवारी कृषी मंत्री व पालकमंत्री जळगाव जिल्हा दौर्यावर होते. गुलाबराव पाटील यांना नियोजन समितीच्या आढावा बैठकीला जायचे असल्याने त्यांनी कार्यक्रमातून जायचे होते. त्यांनी भाषणात तसे सांगितले देखील. त्यावर सत्तारांनी आपल्या भाषणात माझ्यासाठीही एखादा तास ठेवला असता तर बरे वाटले असते, असे देखील म्हटले.
पुढील अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला झुकते माप
या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सत्तार म्हणाले की, सीएमव्हीबाबत शासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यानंतर नुकसान भरपाई कशी द्यावी, त्यावर विचार केला जाईल. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना सक्षम करण्यासाठी पोकरा योजनेचा लाभ दिला गेला आहे. त्यासाठी शासनाने बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्यात 2500 कोटींचा खर्च झाला आहे. पुढे 1500 कोटी शिल्लक आहेत. ही योजना वाढवण्यासंदर्भात शासनस्तरावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. पुढील अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला झुकते माप दिले जाणार आहे. शासनाने जुलैमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई ही साडेचार हजार कोटींची सप्टेंबरमध्येच भरपाई दिली आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी टीका करताना विचार करावा
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या दिवाळी किटमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना सत्तार म्हणाले की, आधी लोकांकडे हे दिवाळी किट पोहोचू द्यावे. हा व्यवहारच झालेला नाही तर गैरव्यवहार कसा होणार. विरोधी पक्षनेत्यांनी टीका करताना विचार करुन करावा, असेही ते म्हणाले. दसरा मेळाव्यात सिल्लोडमधून गेलेल्या वाहनांच्या संख्येबाबत म्हणाले की, सर्व नेत्यांच्या गाड्या गेल्या होत्या. त्यात माझाही खारीचा वाटा होता. त्यात फार काही नव्हते.’