माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल पण…: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात भारत भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. चीनने भारतीय भूभागावर अतिक्रमण केले आहे. हे सत्य आहे मात्र सरकार आणि पंतप्रधान ही गोष्ट मान्य करायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:चे राजकीय अस्तित्व कायम राहावे यासाठी देशातील जनतेशी खोटे बोलत आहे. परंतु चीनने भारतीय भूभागावर ताबा मिळविला आहे हे सत्य असून ते मी ठामपणे सांगत आहे. माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल परंतु जे खरे आहे ते मी सांगणारच असे विधान कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. “ज्यांना वाटत की मी माझ्या देशातील लोकांशी खोटं बोलावं की चीनने घुसखोरी केली नाही. तर मी हे कदापि करणार नाही,” माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे.

“एक भारतीय म्हणून माझी पहिली प्राथमिक देश आणि देशातील जनता आहे. हे एकदम स्पष्ट आहे की, चीन आपल्या भूभागात घुसलेला आहे. ही गोष्ट मला अस्वस्थ करते. माझे रक्त उसळते. दुसरा देश माझ्या देशाच्या भूभागात येऊ कसा शकतो? आता एक राजकीय नेते म्हणून तुम्हाला वाटत की मी गप्प रहावे आणि देशातील लोकांशी खोटे बोलावे, मी सॅटेलाईट फोटो बघितले. निवृत्त अधिकाऱ्याशी बोललो आणि तुम्हाला वाटत की मी खोटे बोलावे की चीन माझ्या देशात घुसखोरी केलेली नाही. तर मी असे खोटे बोलणार नाही. माझ्या मते जे लोक खोटे बोलताय आणि सांगत आहेत की चीनने घुसखोरी केलेली नाही. ते लोक देशभक्त नाहीत. मला याची राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा स्पष्ट शब्दात राहुल गांधींनी आपले मत मांडले आहे.