मनुष्य स्वभाव आणि त्याची जीवनशैली या विषयावर
पिंपरी : भारतीयांची जीवनशैली एकेकाळी आदर्श मानली जात होती. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे व सकाळी पोटभर जेवण करण्याऐवजी चहा घेण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे. डॉक्टरकडे जाण्याचा खडतर मार्ग आपणच तयार करत आहोत, असे प्रतिपादन डॉ. संतोष सुर्यवंशी यांनी येथे केले. चिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवारी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘मनुष्य स्वभाव आणि त्याची जीवनशैली’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना डॉ. सुर्यवंशी बोलत होते. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आतंरराष्ट्रीय धनुर्विद्यापट सोनाली बुंदेल, अविनाश तिकोने, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सचिन गजानन चिंचवडे, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
इंग्रजांकडून चहाचे विष
डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, माकडातून माणुस झाला या माणसाला समाधानी, आनंदी राहायला आवडते. मात्र या व्यतिरिक्त त्याच्याकडे आलेला अतिउत्साह, चिडचिडेपणा, भावनिकता हे मानवी स्वभावाचे कंगोरे कुठून आले याचा विचार करण्यासाठी स्वत:कडे जावे लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात. आपली बदललेली जीवनशैलीच रोगांना निमंत्रण देत असते. पूर्वी ज्या घरात माती, गाय आहे ते सुखी घर मानले जायचे. विहीरीत तोंड बुडवून पाणी पिण्यात, सकाळी शेतावर जाण्यासाठी दही, ठेचा, भाकरी खाण्यात आनंद आणि आरोग्यही लपलेले होते. मात्र इंग्रज आपल्याला चहाचे विष देऊन गेले आणि सगळे गणित बिघडले. सकाळी आपल्याला भूक लागते, पोट मला जेवण हवे आहे, असे सांगत असते. पण आपण चहा घेतो. भूक लागल्यावर जेवण न करता चहा घेल्याने पित्त खवळते. चिडचिडेपणे, एकाजागी स्थिर न वाटणे, मधुमेह, सिडीटी, ऊन सहन न होणे, लिव्हर स्वादुपिंडाचे आजार अंगदुखी या आजारांना निमंत्रण दिले जाते.
जेवणाआधी पाणी पिण्याने अग्निमांद्य
डॉ. सुर्यवंशी पुढे म्हणाले की, दुपारी आपण जेवतो ते काही चवीचे खावे या इच्छेने किंवा टाईम पाससाठी. विझलेल्या चुलीवर अन्न कसे शिजेल याचा विचार आपण करत नाही. हे अन्न अंगावर साठून जडपणा, वजन वाढणे, पोट फुगणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, कॅन्सर या आजारांकडे शरीर वळते. आई, बहीण, वहिनी असे स्वयंपाक घरातले तज्ञ आपल्याकडे असताना आपण शरिराची आबाळ करतो. त्यामुळे मुळव्याधीसारखे आजार होतात. आपण दिवसभर कष्ट करतो, गृहिणी कष्ट करतात पण पोटाला जेवायला घालायला आम्हाला वेळ नाही. जेवणाआधी पाणी पिण्याने अग्निमांद्य होते. त्यामुळे जेवताना प्रत्येक घासाला जीभ ओली होईल एवढेच पाणी प्यावे.
वाहनचालकांना शीस्त नाही
वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी वाहनचालकांना स्वयंशिस्त नसल्याची खंत व्यक्त केली. सिग्नल पाळा, अनावश्यक हॉर्न वाजवू नका, ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने वेळेचे नियोजन करा. लवकर निघा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गांधीपेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे म्हणाले की, समाज प्रबोधनासाठी सुरु केलेल्या जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 27 वे वर्ष आहे. सद्यस्थितीवर आधारित व्याख्यानांना श्रोत्यांचा प्रतिसादही चांगला आहे.