मान्सून केरळात 30 मे रोजी दाखल होणार

0

मुंबई । आकाशाकडे डोळे लावून असलेल्या शेतकर्‍यांसाठी तसेच काहिलीने हैराण झालेल्यांसाठी ‘गुड न्यूज’ आहे. नुकताच अंदमानात हजेरी लावणारा मान्सून यंदा दोन दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी केरळात दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ही माहिती दिली आहे तसेच महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होणार आहे. एरवी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी महाराष्ट्रात आगमन होते. मात्र, यंदा वेळेत दाखल होणार असल्याची चिन्हे आहेत.

सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज
अंदमानात एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात पाऊस वेळेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जास्त पावसाची अपेक्षा असून सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: 1 जूनला केरळात येतो, त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होऊन 7 दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होतो. साधारणतः सप्टेंबरमध्ये राजस्थानमधून त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो.

दुष्काळाची झळ सोसावी लागणार नाही
मान्सून वेळेत आल्यास पिके चांगली होतील तसेच दुष्काळाची झळ सोसावी लागणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अभ्यासानुसार 96 ते 104 टक्के पाऊस म्हणजे सरासरी, 96 टक्क्यांहून कमी म्हणजे सरासरीहून कमी आणि 90 टक्क्यांहून कमी म्हणजे अपुरा अशी पावसाची नोंद केली जाते. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी होईल असा अंदाज आहे. याबरोबरच ‘एल निनो’चा प्रभाव कमी असल्याने पाऊस चांगला पडण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.