पुणे । शासन, प्रशासन आणि जनतेच्या संवेदनशीलतेच्या बळावरच माळीणचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. माळीण हे पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल असून याच धर्तीवर राज्यातील इतर प्रकल्पांतील बाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन करून यापुढेही माळीणकरांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माळीण पुनर्वसन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पार पडला. यावेळी फडणवीस बोलत होते. कोणतीही दुर्घटना ही वाईटच असते. दुर्घटनेनंतर शासन, प्रशासन आणि समाज एकत्र येतो, त्यावेळी दुखा:ची तीव्रता कमी होते. माळीणच्या बाबतीत हेच घडले आहे. माळीणचे पुनर्वसन करताना शासनाबरोबरच प्रशासनानेही संवेदनशीलतेने काम केले, त्यामुळेच हे पुनर्वसित माळीण उभे राहीले. शासनासोबत समाजातील अनेक घटक एकत्र आल्यामुळे माळीणच्या पुनर्वसनाची प्रक्रीया सुकर झाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकशाहीत संवेदनशीलता महत्वाची असते. लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनानेही संवेदनशीलता जपली तर आपली लोकशाही समृध्द होईल, असे त्यांनी पुढे सांगितले. माळीण आणि परिसरातील धोकादायक असणार्या सहा गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा शासनाने तयार केला असून त्यासाठी तातडीने 3 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच माळीण आणि परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असणार्या आसानेगाव तलावासाठी 14 कोटी 77 लाखांचा निधीही शासन देणार आहे. जलसंधारणाला शासनाचे प्राधान्य आहे. आदिवासी जनतेच्या जिव्हाळ्याची पडकई योजना जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आली असली तरी या योजनेला निधी कमी पडू देणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील यांचे भाषण झाले. तर माळीणचे ग्रामस्थ सुहास झांझरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या माळीण पुनर्वसनाची चित्रफित दाखविण्यात आली. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालकाला पोलिओची लस देण्यात आली. माळीण पुनर्वसनासाठी विशेष काम करणार्या अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे विभागीय आयुक्त एस चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तहसीलदार सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी आभार मानले.