मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील महंतांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यामुळे, श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी त्यांना अयोध्येत येऊ देणार नसल्याचे महंत परमहंस दास यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येण्याऐवजी मक्केला जावे, असा खोचक टोलाही या महंतांनी लगावला. तर, मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याची माहिती दिली. अयोध्ये हे माझ्या श्रद्धेचं स्थान असून येत्या ७ मार्चला मी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचे स्वप्न दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले होते. जगात हिंदूंचा स्वत:चा कोणताही देश नाही, म्हणून हिंदूराष्ट्रासाठी बाळासाहेब आग्रही होते. त्यामुळेच, आम्ही कधीच शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही, असेही बाळासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र, सत्तेच्या हव्यासासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली, असे परमहंस दास यांनी म्हटलंय.